आगीच्या प्रमाणात घट : घरांमध्ये दक्षता, व्यावसायिक ठिकाणी दुर्लक्ष : अग्निशमन दलावर शहरासह लगतच्या गावातही सेवा
विनोद सावंत कोल्हापूर
शहर व शहरालगतच्या गावांमध्ये गॅसला स्फोट, शॉर्ट सर्कीट, गंजी पेटण्याच्या घटना घडतात. औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळतीही होते. चार वर्षामध्ये अशा प्रकारे 786 आगीच्या घटनांची नोंद महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे झाली असून यामुळे तब्बल 11 कोटी 57 लाख 81 हजारांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर महापालिकेचा अग्निशमन दल कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी 24 तास सज्ज असतो. आग लागणे, गॅस गळती, महापूर, धोकादायक इमारत कोसळणे अशा घटनावेळी अग्निशमन दल तत्काळ दाखल होऊन जीवाची बाजी लावून परिस्थिती नियंत्रणात आणते. यामध्ये सर्वात अवघड काम म्हणजे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे असते. नुकत्याच शिवाजी चौकात पाच दुकानांच्या आगीच्या घटनेवेळी हे समोर आले आहे. यावेळी इलेक्ट्रीक साहित्य दुकानांत असल्याने त्यातून स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलास कसरत करावी लागली. सात तासानंतर आग अटोक्यात आली. यानिमित्ताने जुने वायरींग, बेकायदेशीर गोदाम, फायर ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट विषय चर्चेत आले. अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार महिन्यांला लहान-मोठ्या अशा किमान 10 ते 15 आगीच्या घटना घडत असल्याची नोंद आहे. चार महिन्यांत तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये शिवाजी पार्क येथे झोपडपट्टी, दाभोळकर कॉर्नर येथे हॉटेल आणि शिवाजी चौक येथील कटलरी दुकानाला लागलेल्या आगीचा समावेश आहे. या घटनेवेळी तत्काळा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्याने जीवीत हानी घडलेली नाही.
आगीच्या घटनेचे प्रमाण झाले कमी
चार वर्षात आगीच्या घटनेचे प्रमाण कमी होत आहे. 2018-19 मध्ये 236 आगीच्या घटना घडल्या होत्या. 2019-20 मध्ये 226 तर 2020-21 मध्ये 191 आणि 2021-22 मध्ये 131 आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच नुकसीनचेही प्रमाण घटले आहे. 2018-19 मध्ये 3 कोटी 90 लाखांचे नुकसान झाले होते तर 2021-22 मध्ये 1 कोटी 27 लाखांचे नुकसान झाले आहे.
हद्दवाढ नको पण मनपाच्या सेवा पाहिजेत
शहरालगतच्या गावातून एकीकडे हद्दवाढीला विरोध केला जात आहे. दुसरीकडे महापालिकेच्या सेवा मात्र, घेतल्या जात आहे. अग्निशमन दल शहराबाहेरील गावामध्ये आग लागल्यास सेवा देते. संबंधितांकडून नाममात्र फी घेतली जाते.
व्यावसायिक ठिकाणी आगीच्या घटना वाढल्या
नागरीक आपत्ती येऊ नये म्हणून दक्षता घेत असल्यानेच घरगुती आगीच्या घटना कमी होत आहेत. जुने वायरींग बदलणे, गॅसची जुनी पाईप बदलण्याबाबत लोकांमध्ये जागृत्ती झाली आहे. तसेच नवीन वायरींग आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्यानेही शॉर्ट सर्कीट होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या उलट व्यावसायिक ठिकाणच्या इमारती जुन्या असल्याने वेळच्या वेळी वायरींगची तपासणी होत नाही. त्यामुळे घरगुतीच्या तुलनेत व्यावसायिक ठिकाणी आगीच्या घटना वाढल्या आहेत.
पश्चाताप करण्याची वेळ येऊ देवू नका
व्यावसायिक सुरक्षेतेसाठी उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष करतात. मग आग लागल्यानंतर लाखो रूपयांचे नुकसान झाल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. वेळीच जुने वायरींग बदलणे, फायर ऑडीट करून घेणे, साहित्य दाटवाटीत न ठेवणे, गोडाऊन शहराबाहेर करणे इतके
जरी केले तरी मोठी दुर्घटना टळू शकते.
चार वर्षात शहर व शहरालगत 786 आगीच्या घटना घडल्या असून 11 कोटींचे नुकसान झाले आहे. चार वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आगीच्या घटनेचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांमध्ये जनजागृत्ती झाल्यानेच हे शक्य झाले आहे. परंतू व्यावसायिकांकडून अद्यपही दक्षता घेण्यामध्ये दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
मनिष रणभिसे, स्टेशन ऑफीसर, अग्निशमन दल मनपा
वर्ष आगीच्या घटना नुकसान रक्कम
2018-19 236 3 कोटी 88 लाख 90 हजार
2019-20 226 3 कोटी 90 लाख 74 हजार
2020-21 191 2 कोटी 50 लाख 32 हजार
2021-22 133 1 कोटी 27 लाख 85 हजार
एकूण 786 11 कोटी 57 लाख 81 हजार