भाजीपाल्याची आवक कमी, वाढत्या उन्हाचा परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
पाऊस लांबणीवर पडल्याने भाजीपाला उत्पादनावरदेखील परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भाज्यांचे दरदेखील वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात गाजर, काकडी, बिन्स, ओली मिरची, गवार, दोडकी आदी भाज्यांचे दर चढे आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत भेंडीच्या दरात घसरण झाली. त्याबरोबर टोमॅटो देखील पुन्हा 30 रुपये किलो झाला आहे.
किरकोळ आठवडी बाजारात फ्लॉवर 20 रुपये एक, शेवगा 20 रुपये पेंडी, बटाटा 30 रु. किलो, ढबू 50 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, बिन्स 60 रु. किलो, वांगी 50 रु. किलो, भेंडी 30 रु. किलो, टोमॅटो 30 रु. किलो, गवार 80 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, कोबी 10 रु. एक, मेथी 25 रुपयांना एक पेंडी, पालक 20 रुपयांना चार पेंड्या, कांदापात 20 रुपयाला चार पेंड्या, लालभाजी 10 रु. एक, शेपू 15 रु. एक, फ्लॉवर 20 रु. एक, कोथिंबीर 15 रु. पेंडी असा भाजीपाल्याचा दर आहे.
उन्हाचा कडाका कायम, तरीपण लिंबू दर जैसे थेच
उन्हाचा कडाका कायम असला तरी लिंबू दरात मात्र मागील आठवड्यापासून घसरण झाली आहे. 10 रुपयाला 5 लिंबू विक्री होऊ लागली आहे. वळीव पावसाने दडी मारली असून मान्सूनदेखील लांबणीवर पडला आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. विहिरी, तलावांच्या पाणीपातळीत घट झाल्याने भाजीपाला लागवड घटली आहे. त्यामुळे आवकदेखील कमी होऊ लागली आहे.
आंब्यांची आवक
किरकोळ बाजारात विविध जातीचे आंबे दाखल होऊ लागले आहेत. हापूस, तोतापुरी, निलम, पायरी जातीचे आंबे पहायला मिळत आहेत. आंब्यांच्या दरात घसरण होऊ लागली आहे. 400 ते 500 रुपये डझन याप्रमाणे आंब्यांची विक्री सुरू आहे. स्थानिक आंबादेखील मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. त्यामुळे आंब्यांनी बाजारपेठ बहरताना दिसत आहे.
तूरडाळ 160 रुपये किलो
वीज, इंधन, गॅस दरवाढीपाठोपाठ आता तूरडाळीचा भाव देखील गगनाला भिडला आहे. 120 रुपये किलो असणारी तूरडाळ 160 रुपये झाली आहे. आधीच महागाईने डोके वर काढले आहे. त्यातच सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू लागल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.