सुकृत मोकाशी / पुणे :
राज्यभरात कोरोनाचा जोर ओसरत असताना दुसरीकडे पावसाळी स्थितीमुळे आता डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यूमुळे रक्तपेढय़ांमध्ये प्लेटलेट्सच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, त्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तापाने प्लेटलेट्स नष्ट होतात आणि नवीन तयार होण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने शेवटी प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. त्यामुळे डेंग्यूंच्या रुग्णात जशी वाढ होत आहे, तसे रक्तपेंढयांमध्ये प्लेटलेट्सच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्लेटलेट्स हे रक्तातील सेक्युलर घटकांपैकी एक आहे. पांढऱ्या आणि लाल रक्तपेशीसह रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव कमी करण्यात या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. काही डेंग्यूच्या रुग्णांना प्लेटलेट्सची गरज भासू शकते. कारण योग्य द्रवपदार्थ आणि औषधोपचार करूनही त्यांच्यात पुरेशा प्लेटलेट्स तयार होऊ शकत नाही.
याबाबत ‘तरुण भारत’शी बोलताना ‘रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’चे राम बांगड म्हणाले, आजघडीला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने रक्तपेंढयांमध्ये प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ झाली आहे. प्लेटलेट्सचे आयुष्य हे 5 दिवस असते. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे. एका डेंग्यूच्या रुग्णाला चार रक्तदात्यांच्या रक्तातून विघटित केलेले चार किंवा त्यापेक्षा दुप्पट प्लेटलेट्स लागू शकतात. त्यामुळे रक्तदात्यांचा तुटवडा भासू शकतो. सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) ची प्रक्रिया ही चार तासांची असल्याने एका बॅगेची किंमत ही 9 ते 12 हजार असल्याने त्या रुग्णाला देणे परवडत नाही. त्यामुळे यासाठी रुग्णांना बरीच वणवण करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
15 ऑगस्टपर्यंत एकही रक्तदान शिबीर नाही
येत्या 15 ऑगस्टपर्यंत एकही रक्तदान शिबिर नसल्याने याचा तुटवडा अधिक भासणार आहे. त्यामुळे अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यामध्ये रक्तदात्यांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहनही बांगड यांनी यावेळी केले.
आरोग्य विभागातर्फे आवाहन
पावसाळ्यात डेंग्यूचा आजाराचा मोठय़ा प्रमाणात फैलाव होतो. डासांच्या प्रभावामुळे आजार पसरत असल्याने डासोत्पत्तीची ठिकाणे लवकरात लवकर स्वच्छ करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा : सेनेकडून आता शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग