आरोग्यावर परिणाम : सेंद्रीय शेतीला प्राधान्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. 2018-19 मध्ये 35.58 लाख मेट्रिक टन खताचा वापर झाला होता. त्या तुलनेत 2021-22 मध्ये 43.41 लाख मेट्रिक टन खताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खतांचा वापर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील 1 कोटी 35 लाख 26 हजार 765 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 2 लाख 9 हजार 569 हेक्टर क्षेत्रात सेंद्रीय खताचा वापर केला जात आहे. रासायनिक खतांचा वापर वाढल्याने अन्नातील कस आणि चवदारपणा कमी झाला आहे. परिणामी अनेक आजारांची यातून लागण होवू लागली आहे.
सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवावे यासाठी शासन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून विविध उपाय हाती घेतले जात आहेत. मात्र शेतकरी कमी वेळेत अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे जमिनीच्या कसावरदेखील याचा विपरित परिणाम होऊ लागला आहे. शिवाय रासायनिक खतांचा अधिक वापर करणारी जमीनदेखील पडिक होवू लागली आहे.
वाढत्या रासायनिक खतांमुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे यामधील चवदारपणा कमी झाला आहे. शिवाय रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेली पिके आरोग्यासाठी हानिकारक ठरू लागली आहेत. त्यामुळे सेंद्रीय खतांचा वापर करून शेती करणे काळाची गरज बनली आहे.