चेतेश्वर पुजाराची शंभरावी कसोटी, फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या फलंदाजांची सत्त्वपरीक्षा होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसरी कसोटी येथील अरुण जेटली स्टेडियमवर मैदानावर आज शुक्रवारपासून सुरू होत असून नागपूरप्रमाणेच फिरकीस अनुकूल ठरणाऱया खेळपट्टीवर पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. सकाळी 9.30 पासून सामन्याला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
मध्यफळीतील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराची ही शंभरावी कसोटी असल्याने सर्वांचे लक्ष त्याच्यावर केंद्रित झाले आहे. शतक नोंदवत ही कसोटी संस्मरणीय करणे त्याला निश्चितच आवडेल. तसे झाल्यास भारताच्या आघाडी फळीला स्थिरताही प्राप्त झाल्यासारखे होईल. आघाडी फळीकडून अलीकडे क्वचितच भरीव योगदान मिळाले आहे. नागपूर कसोटीत कर्णधार रोहित शर्माने नोंदवलेले शतक हा अपवाद ठरला होता. मात्र सलामीवीर केएल राहुल, विराट कोहली, पुजारा हे सर्वच जण अपयशी ठरले होते. राहुलसाठी वेळ कमी असून कोहलीचा वारसदार मानला जाणारा शुबमन गिल पूर्ण बहरात असूनही प्रतीक्षेत आहे. 46 कसोटीच्या कारकिर्दीत त्याने अनेक संधी वाया घालविल्या असून त्याची सरासरीही (34) फारशी आकर्षक नाहीय. उर्वरित दोन कसोटीसाठी संघनिवड करण्याआधी मिळालेल्या शेवटच्या संधीचा उपयोग करून घेण्याची संधी संव्यवस्थापन त्याला देते का, हे पाहणेही मनोरंजक ठरेल.
पहिल्या कसोटीत अश्विन व जडेजा या फिरकी द्वयीने ऑस्ट्रेलियावर मोठे दडपण आणले होते. या सामन्यातही संथ खेळपट्टी पाहुण्यांचे स्वागत करेल, असे निश्चितपणे म्हणता येईल. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मनापासून फलंदाजी केली तरच हा सामना पाचव्या दिवसांपर्यंत लांबू शकतो. कोटलाची खेळपट्टी प्रारंभीचा ओलावा सुकल्यानंतर पूर्णतः फिरकीस अनुकूल ठरते, असा तिचा लौकीक आहे. अलीकडच्या काळात जडेजा, आता जखमी असलेला रिषभ पंत, श्रेयस अय्यर या मध्यफळीतील त्रिकुटानेच भारताला अनेकदा तारले असल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मान्य केले आहे. नागपूरमधील पहिल्या कसोटीतही जडेजा-अक्षर पटेल यांनीच फलंदाजीत चमक दाखवून ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोटलाची खेळपट्टी जामठापेक्षा संथ असल्याने भारतीय फलंदाजांना रोहित शर्माचे बचावात्मक आक्रमण हे धोरण राबवावे लागेल. एका बाजूची सीमारेषा लहान असल्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स नाथन लियॉनला ओल्ड पॅव्हेलियन एन्डकडून वापरण्यास धजावणार नाही. कारण लेगसाईडची सीमारेषा केवळ 60 मीटर्सची असल्याने भरपूर धावा जाऊ शकतात.
पाठीच्या दुखण्यातून सावरलेला श्रेयस अय्यर या सामन्यात अंतिम संघात खेळताना दिसेल. संघव्यवस्थापनाच्या धोरणानुसार एखादा खेळाडू जखमी होण्यापूर्वी चांगला खेळत असेल तर त्यातून बरा झाल्यानंतर त्याला थेट संघात स्थान दिले जाते. त्यानुसार श्रेयसला या सामन्यात संधी मिळेल. श्रेयस पाच दिवसांचा वर्कलोड सहन करू शकत असेल तर तो अंतिम संघात निश्चितच खेळेल, असे द्रविड यांनी म्हटले आहे. द्रविडनी असे म्हटले असले तरी ते अशा खेळाडूना लगेचच संधी देत नाहीत, असा अनुभव आहे. श्रेयस मागील महिनाभर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे मॅचफिटनेस पाहण्याआधीच त्याला थेट सामन्यात खेळवणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे द्रविड त्याला खरोखरच संधी देतील का, याबाबत शंका वाटते. सूर्याचे स्थान निश्चित असून पंतची आक्रमकता त्याच्याकडून अपेक्षित आहे. कोना भरत हा फलंदाजी करू शकणारा यष्टिरक्षक आहे. त्यामुळे सूर्याकडूनच फटकेबाजीची अपेक्षा केली जात आहे.
ऑस्ट्रेलियाला वॉर्नरची चिंता
सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा खराब फॉर्म ही ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब ठरली आहे. शमीने त्याची ज्याप्रमाणे दांडी उडविली ते पाहता त्याला या सामन्यात संधी मिळेल का, याची शंका वाटते. दिल्लीची खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच टर्न घेणारी असल्याने ऑस्ट्रेलिया तिसरा स्पिनर संघात घेण्याची अपेक्षा आहे. मिचेल स्टार्कची उणीव ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीत जाणवली होती. त्याच्या समावेशाने त्यांची गोलंदाजी भक्कम होईल आणि वेगवान गोलंदाजीस अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याच्या त्याच्या अनुभवाचा उपयोगही संघाला होईल.
संभाव्य संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, पुजारा, कोहली, गिल, जडेजा, केएस भरत, आर. अश्विन, अक्षर पटेल, शमी, सिराज, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, इशान किशन.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), वॉर्नर, उस्मान ख्वाजा, लाबुशेन, स्मिथ, ट्रव्हिस हेड, ऍलेक्स कॅरे, रेनशॉ, हँड्स्कॉम्ब, लियॉन, ऍश्टन ऍगर, बोलँड, लान्स मॉरिस, स्वेप्सन, टॉम मर्फी, हॅझलवुड, कॅमेरॉन ग्रीन, स्टार्क.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून,थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क