फिरकीस अनुकूल खेळपट्टी अपेक्षित, इशान किशन, सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता, स्मिथकडेच कांगारूंचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथी व शेवटची कसोटी सुरू होत असून ही कसोटी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी निश्चित करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तिसरी कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचाही आत्मविश्वास वाढला असून बॉर्डर-गावसकर करंडक जिंकता येत नसला तरी मालिका बरोबरीत सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सकाळी 9.30 पासून सामन्याला सुरुवात होईल आणि त्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून केले जाईल.
भारतात संघाचे नेतृत्व करणे हा बुद्बिबळाचा खेळ असल्याचे तिसरी कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथने म्हटले होते. हा खेळ खेळण्यास तोही पुन्हा उत्सुक झाला आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 असा आघाडीवर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र तिसरी कसोटी जिंकल्यानंतरच अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी लंकेचा अडथळा असून न्यूझीलंडविरुद्ध त्यांची मालिका होत आहे. त्यांची पहिली कसोटी बुधवारपासूनच सुरू होत आहे. मात्र भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातच डब्ल्यूटीसीची अंतिम लढत होण्याची जास्त शक्यता आहे.
कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने नियमित कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यासाठीही उपलब्ध होणार नसल्याने स्मिथला पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. भारतात नेतृत्व करणे आनंददायक व कस लावणारा अनुभव असल्याचे तो म्हणतो.
या सामन्यासाठी भारत व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान उपस्थित राहणार असून ही खेळपट्टीही फिरकीस अनुकूल ठरणारीच असणार आहे. जगातील हे सर्वात मोठे स्टेडियम असून 1 लाख 32 हजार त्याची प्रेक्षकक्षमता आहे. तिसऱया सामन्यात विश्रांती दिलेल्या शमीला अंतिम संघात संधी मिळेल. दोन वर्षापूर्वी या मैदानात जो रूटच्या इंग्लंड संघाला दोनदा दणका मिळाला होता. त्यापैकी डे-नाईट कसोटी केवळ दोन दिवसातच समाप्त झाली होती. 1935 नंतर दोन दिवसात संपलेली ती पहिलीच कसोटी होती.
स्थानिक गुजरात क्रिकेट संघटनेकडून खेळपट्टी नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले असले तरी दोन्ही संघ पुन्हा एकदा तीन स्पिनर्सना संघात स्थान देण्याची अपेक्षा आहे. भारतीय संघ यावेळी मनगटी स्पिनर कुलदीप यादवला अक्षर पटेलच्या जागी खेळविण्याची शक्यता आहे. अक्षरने तीन कसोटीत केवळ एक बळी मिळविला आहे. याशिवाय फलंदाजी मजबूत करण्यासाठी एक सीम बॉलर कमी करून स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात घेतले जाईल, अशीही शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन स्पिनर्स लियॉन व कुहनेमन यांनी इंदोरमधील खेळपट्टीचा पुरेपूर लाभ उठवत ऑस्ट्रेलियाला 2004 पासून भारतीय भूमीत फक्त दुसरा विजय मिळवून दिला.
खेळपट्टी फिरकीस अनुकूल असली तरी ती फलंदाजांनाही मदत करण्याची अपेक्षा असल्याने झारखंडचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला या सामन्यात खेळविले जाण्याची अपेक्षा आहे. पहिल्या तीन कसोटीत केएस भरतला संधी देण्यात आली. मात्र त्याच्या फलंदाजीत वेशेष चमक दिसून आली नाही. त्यामुळे इशान किशनला त्याच्या जागी आजमावून पाहिले जाऊ शकते. पंतचा बॅकअप म्हणून भरतला गेल्या वर्षभरापासून तयार केले जात आहे. पण या मालिकेतील पाच डावात त्याला 8, 6, नाबाद 23, 17 व 3 अशा धावा जमविता आल्या आहेत. संथ फिरकी घेणाऱया खेळपट्टीवर त्याचे यष्टिरक्षण प्रभावी आहे. पण इंदोरमधील जास्त फिरकी घेणाऱया खेळपट्टीवर तो काही वेळा झगडताना दिसला. त्याची पाच डावात 57 धावा ही उपयुक्त कामगिरी म्हणता येणार नाही. नावाजलेले फलंदाज टर्निंग पिचवर झगडत असताना त्याची फलंदाजी संघाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारी नाही. मात्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याचे समर्थन केले आहे.
इशान किशनकडून दविड यांनी मंगळवारी बराच वेळ सराव करून घेतला. मोतेराची खेळपट्टी मजबूत वाटत असून त्यावर बाऊन्सही असल्याचे जाणवत आहे. अशी खेळपट्टी इशानच्या स्टाईलला उपयुक्त ठरणारी असल्याने त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. याशिवाय लंडन, ओव्हलवीर डब्ल्यूटीसीच्या अंतिम लढतीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडेल त्यावेळी वेगवान खेळपट्टीवर भरत जलद गोलंदाजांसमोर सहज शिकार होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन इशानला संधी दिली जाईल..