वृत्तसंस्था/ मेलबर्न
विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका या वर्षांच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात होणार आहे. सदर मालिका ऑस्ट्रेलियात खेळविली जाणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी या मालिकेतील सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे जाहीर केली. दरम्यान या वर्षीच्या क्रिकेट हंगामाअखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरूष संघातील मालिका खेळविण्याची शक्यता असून अद्याप या प्रस्तावाला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. गेल्या मार्चमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. येत्या जुलैमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात भारत आणि इंग्लंड महिला संघातील तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार असून या मालिकाचे यजमानपद इंग्लंड भूषविणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा पुरूष क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर येणार असून या दौऱयात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची ही सरावाची मालिका राहील. गेल्यावर्षी फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. या वर्षांच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन पुरूष संघ भारताच्या दीर्घ दौऱयावर येणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 9 ते 19 जून या अवधीत भारतात होणार आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्यात आलेली इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवी व शेवटची कसोटी 1 जुलै रोजी इंग्लंडमध्ये होणार आहे.