वृत्तसंस्था/ आइंडहोव्हन
एफआयएच प्रो लीगमधील गुरुवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा 3-0 असा पराभव भारतीय संघाने केला. बुधवारी रात्री यजमान नेदरलँड्सविऊद्ध भारताने एका गोलाची आघाडी मिळविल्यानंतरही 1-4 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले होते. परंतु हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने अर्जेंटिनावर शानदार विजय मिळवून त्याची भरपाई केली.
कर्णधार हरमनप्रीतने 33 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आघाडी घेतली. अमित रोहिदासने ही आघाडी वाढविली आणि अभिषेकच्या गोलने भारताचा दणदणीत विजय निश्चित केला. या विजयामुळे भारत 14 सामन्यांतून 27 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला असून ब्रिटनवर (12 सामन्यांतून 26 गुण) आघाडी घेतली आहे. भारताचा पुढील सामना आज शनिवारी येथे नेदरलँड्सशी रिव्हर्स टायमध्ये होईल.
सुऊवातीला आघाडी घेतल्यानंतरही बुधवारी रात्र भारतासाठी निराशा आणणारी ठरली होती. पाच पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी स्ट्रोक मिळालेला असतानाही हरमनप्रीतने 11 व्या मिनिटाला नोंदविलेला गोल हा नेदरलँड्सविरुद्ध भारताचा एकमेव गोल ठरला होता. मात्र अर्जेन्टिनाविरुद्धच्या सामन्यातील विजयाने संघाची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे.
पहिल्या सत्राच्या सुऊवातीला अर्जेंटिना अधिक आक्रमक दिसत होता. त्यांनी बचाव करताना भारताला चुका करण्यासही भाग पाडले. परिणामी तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, परंतु संधीचा फायदा त्यांना घेता आला नाही. त्यानंतर चेंडूवर ताबा मिळवत भारताने वेगवान प्रतिआक्रमणे केली. यात आघाडीपटू अभिषेकने हाणलेला एक शक्तिशाली फटका गोलखांब्याला आदळला. अर्जेंटिना त्यांच्या आक्रमणात धोकादायक दिसत होता, परंतु अनुभवी गोलरक्षक श्रीजेशने दोनदा शानदार पद्धतीने बचाव केल्यामुळे भारताला फटका बसला नाही.
पहिल्या सत्रात एकही संघ गोल करू शकला नाही, दुसऱ्या सत्रात भारताने सकारात्मक सुऊवात करून दबाव वाढवला. युवा आघाडीपटू सेल्वम, अभिषेक आणि सुखजित सिंग यांनी गोलच्या संधी निर्माण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिसऱ्या सत्राला सुरुवात होऊन तीन मिनिटांपेक्षा कमी कालावधीत भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्यावर हरमनप्रीत सिंगने अचूक ड्रॅग-फ्लिक हाणून गोल केला आणि या मोसमातील त्याच्या वैयक्तिक गोलांची संख्या 18 वर नेली.
39 व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करत आघाडी 2-0 अशी वाढवली. या सत्रात सुमारे तीन मिनिटे बाकी असताना मनदीप सिंगने एक जबरदस्त फटका हाणून संघाला तिसऱ्या गोलची आशा दाखविली होती. परंतु सांतियागोने सुरेखरीत्या फटका अडवत मनदीपचे 100 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदविण्याचे स्वप्न उधळून लावले. चौथ्या सत्रात अर्जेंटिनाने गोलसाठी जोर लावलेला असताना भारताने निश्चिंत राहून आणखी एका सुरेख प्रतिहल्ल्याद्वारे तिसरा गोल केला. यावेळी विवेक सागर प्रसादने अभिषेकला पास दिला आणि त्याने चेंडू जाळ्यात फटकावत भारताच्या 3-0 ने विजयावर शिक्कामोर्तब केले.