सैन्याचे आधुनिकीकरण करण्यास भारत अपयशी : निर्मितीक्षेत्रातही पिछाडीवर
वृत्तसंस्था/ सिंगापूर
चीनने सिंगापूरमध्ये झालेल्या आशियातील सर्वात मोठ्या सुरक्षाविषयक चर्चासत्रात बोलताना आपल्याला भारताकडून सुरक्षेचा कुठलाच धोका नसल्याचे म्हटले आहे. भारताने स्वत:च्या सैन्याचे आधुनिकीकरण केलेले नाही, यामुळे भारत आम्हाला आव्हान देऊ शकत नसल्याचे चिनी सैन्याच्या शिष्टमंडळाने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
चीनचे संरक्षण उत्पादन क्षेत्र आणि निर्मितीच्या तुलनेत भारत सध्या खूपच पिछाडीवर आहे. आमच्यासारखी कामगिरी करण्यास भारताला अनेक दशके लागतील असा दावा चिनी अधिकाऱ्यांनी केला आहे.
भारतीय सैन्यातील यंत्रणा पाहिल्यास त्यात कुठलाही रणगाडा, विमान किंवा युद्धनौका त्याने स्वत: तयार केलेली नाही असे वक्तव्य चिनी सैन्याच्या अकॅडमी ऑफ मिलिट्री सायन्सचे सीनियर कर्नल झाओ शियाओझुओ यांनी केले आहे. भारताने महाशक्ती होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी स्वत:च्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, परंतु याचा प्रभाव भारत-चीन संबंधांवर पडणार नसल्याचा दावा कर्नल झांग ची यांनी केला आहे. ब्रिक्स अन् एससीओ यासारख्या संघटनांमधील भारत अन् चीनचा सहभाग पाहता क्वाडचा कुठलाच प्रभाव पडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
चीनचा अवाढव्य संरक्षण अर्थसंकल्प
चीनने तैवान अन् दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान स्वत:च्या संरक्षण अर्थसंकल्पात मागील वर्षी 4.2 टक्क्यांची वाढ केली होती. यानंतर चीन संरक्षण खर्चाप्रकरणी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. चीनचे बजेट भारताच्या तुलनेत 4 पट अधिक आहे. भारताने स्वत:च्या संरक्षणावर 2022 मध्ये 6 लाख कोटी रुपये खर्च केले होते. तर चीनने 23 लाख कोटी रुपयांचा खर्च केला होता.
चीनच्या विमानवाहू युद्धनौकेला भेगा
चीनच्या फुजियान या विमानवाहू युद्धनौकेला मोठ्या भेगा पडल्याचा खुलासा उपग्रहीय छायाचित्रांद्वारे झाला आहे. ही युद्धनौका चीनने स्वत:च निर्माण केली होती. चीनच्या ब्ल्यू वॉटर नेवी ठरण्याच्या मोहिमेचा ही युद्धनौका हिस्सा आहे. 2035 पर्यंत चीन आणखी 6 विमानवाहू युद्धनौका निर्माण करण्याचे लक्ष्य बाळगून आहे. परंतु फुजियान विमानवाहू युद्धनौकेला भेगा पडल्याने त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.