चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली यांचे परिणाम समाजातील सर्व स्तरांमध्ये दिसून येऊ लागले असून त्याचमुळे आज जाडजूड वा अतिलठ्ठ व्यक्ती मोठ्या प्रमाणात आपल्या अवतीभवती आढळू लागल्याहेत…याचा परिणाम म्हणजे बिघडणारं आरोग्य, त्यामुळं आरोग्य निगा सेवेवर ताण, औषधांवर वाढता खर्च अन् अर्थव्यवस्थेचं नुकसान…उर्वरित जगाबरोबर भारतात देखील ही समस्या किती वाढलीय अन् भविष्यात ती किती उग्र बनू शकते त्यावर हा दृष्टिक्षेप…
‘अतिस्थूलता’ वा खूप जास्त ‘लठ्ठपणा’…मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अन् त्याहून महत्त्वाचं म्हणजे आरोग्याचे तीन तेरा वाजविणारा एक रोगच…एका अंदाजानुसार, 2035 पर्यंत सुमारे 4 अब्ज लोक किंवा विश्वातील 50 टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही ‘ओव्हरवेट’ वा स्थूल बनलेली असेल…‘ऑबेसिटी’कडे (लठ्ठपणा) जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या देशांशी नेहमीच जोडून पाहण्यात येतंय आणि त्यात चूक देखील नाहीये. परंतु ‘वर्ल्ड ऑबेसिटी फेडरेशन’च्या (डब्ल्यूओएफ) मतानुसार, गरीब राष्ट्रांत सुद्धा अंग फुगण्याच्या प्रकारांनी जोर पकडलाय…
भारताचा विचार केल्यास प्रौढांमधील लठ्ठपणा 2035 सालापर्यंत 5.2 टक्क्यांनी वाढणार, तर मुलं तब्बल 9.1 टक्के या गतीनं येऊ घातलेल्या 12 वर्षांत बेढब बनतील, अशी भविष्यवाणी करण्यात आलीय…2020 मध्ये भारतातील लठ्ठ व्यक्तींना आरोग्याशी संबंधित बाबींवर तब्बल 2.5 अब्ज डॉलर्स खर्च करावे लागले, तर 2035 पर्यंत अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास या रोगामुळं आपल्या देशाचं 31.6 अब्ज डॉलर्सचं नुकसान होईल…येऊ घातलेल्या 12 वर्षांत लोकांना अतिस्थूलपणा कमी करण्यासाठी 8.4 अब्ज डॉलर्सची औषधं घ्यावी लागतील अन् अर्थव्यवस्थेला मार पडेल तो 129.3 अब्ज डॉलर्सचा वा ‘जीडीपी’च्या 1.8 टक्क्यांचा…
2019 सालच्या एका अहवालात म्हटलं होतं की, भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, नायजेरियामधील ‘कनिष्ठ-मध्यम’ उत्पन्नाच्या गटातील व्यक्ती अतिस्थूल बनण्याच्या दिशेनं प्रवास करण्याची शक्यता वाढू लागलीय…लठ्ठ माणूस 20 टक्के अधिक ‘जीएचजी’चं उत्सर्जन करतो अन् हे अतिरिक्त उत्सर्जन वर्षाला सुमारे 700 मेगाटन इतकं म्हणजेच ‘कार्बन-डाय-ऑक्साईड’च्या समकक्ष…
अशी राहिलीय अतिस्थूल भारतीयांची टक्केवारी…
आर्थिक वर्ष पुरुष महिला
2015 – 16 19.6 टक्के 20.6 टक्के
2019 ते 21 22.9 टक्के 24 टक्के
काय म्हणतोय ‘वर्ल्ड ऑबेसिटी अॅटलास 2023’ ?…
? अतिस्थूलतेशी निगडीत प्रश्नांशी झुंजणाऱ्या व्यक्तींचा खर्च 2035 पर्यंत विश्वात चक्क 4 ट्रिलियन डॉलर्सची सीमा ओलांडेल. शिवाय त्यांना लवकर नोकरीचा राजीनामा द्यावा लागण्याचा वा मृत्यूला सामोरं जावं लागण्याचा धोका भेडसावेल. त्याचा परिणाम संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांवर फार मोठ्या प्रमाणात पडेल…
? अतिस्थूल लोकांची संख्या श्रीमंत राष्ट्रांत जास्त असली, तरी गरीब वर्गाचं व कनिष्ठ मध्यमवर्गाचं प्राबल्य असलेल्या राष्ट्रांत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दर्शन घडेल. त्या दोन्ही गटांचं त्यामुळं चक्क 350 अब्ज डॉलर्सचं नुकसान होण्याची भीती…मध्यम उत्पन्नाच्या गटातील राष्ट्रांत लठ्ठ लोकांचं प्रमाण पुरुषांत 66 टक्के, तर महिलांत 70 टक्क्यांपर्यंत झेप घेण्याची शक्यता…
लठ्ठपणाला कारणीभूत घटक…
? प्रक्रिया केलेल्या अन्नाचा मोठ्या प्रमाणात वापर, जास्त वेळ बसून घालवणं अन् व्यायामाचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणं…
? काही काळापूर्वीचं ‘कोरोना’ महामारीमुळं ओढवलेलं ‘लॉकडाऊन’ही यास बऱ्याच प्रमाणात हातभार लावून गेलंय. कारण त्यानं सर्वांनाच घरात कोंडून राहायला लावलं…
? जोडीला वाढणारं तापमान व पावसाचं जास्त प्रमाण यांनाही ‘ऑबेसिटी’साठी दोष द्यावा लागेल. कारण त्यामुळं प्रौढ व्यक्तींच्या तसंच मुलांच्या शारीररिक हालचालींना जवळपास आळाच बसतोय…
? त्याखेरीज हवामान बदलाचा फार मोठा परिणाम फळांवर व भाजीपाल्यांच्या उत्पादनावर होत असल्यामुळं लोकांना अत्यंत गरजेचा पोषक व आरोग्यदायी आहार मिळणं कठीण होऊ लागलंय…उत्पन्न घटल्यानं त्यांची किंमत वाढतेय अन् ती हवी तशी विकत घेणं सर्वसामान्यांना परवडत नाही. किमती वाढल्यानं लोक प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात अन् ‘ऑबेसिटी’च्या दिशेनं घातलेलं ते पहिलं पाऊल असतं…
? 2019 च्या ‘लॅन्सेट’च्या अहवालात म्हटलं होतं की, कमी अन्न कुपोषणाला, तर जास्त प्रमाणात मिळणारं खाद्य हे अतिस्थूलतेला आमंत्रण देतं…
लठ्ठपणाचा वैश्विक आलेख…
क्षेत्र 2020 2025 2030 2035
पश्चिम पॅसिफिक 17 कोटी 23 कोटी 38 कोटी 37 कोटी
दक्षिणपूर्व आशिया 10 कोटी 14 कोटी 20 कोटी 27 कोटी
युरोप 21 कोटी 23 कोटी 26 कोटी 29 कोटी
अमेरिका 29 कोटी 34 कोटी 40 कोटी 45.5 कोटी
आफ्रिका 8.5 कोटी 12 कोटी 17 कोटी 24 कोटी
भारतातील ‘वजनदारां’ची गणती करणारं सर्वेक्षण व निकष…
? भारतात किती लोक सामान्यापेक्षा अधिक वजनाचे अथवा स्थूल आहेत ते ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’तून स्पष्ट झालंय. या सर्वेक्षणाची पहिली फेरी झाली ती 1992-93 मध्ये. त्यानंतर आतापर्यंत पाच फेऱ्या झालेल्या असून 2019-21 मध्ये पाचवी फेरी झालीय…
? जर एखाद्या व्यक्तीचा ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) 30 पेक्षा जास्त असेल, तर ती व्यक्ती लठ्ठ मानली जाते. ‘बीएमआय’ हा एखाद्याचं वजन आणि उंची यांचे गुणोत्तर. तो 25 पेक्षा जास्त आणि 30 पेक्षा कमी असेल, तर वजन सामान्यापेक्षा जास्त मानलं जातं, पण त्या व्यक्तीला लठ्ठ गणलं जात नाही…
वाढत चाललेलं वजन…
? ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’च्या ताज्या फेरीनुसार, भारतात 16 पैकी एक महिला आणि 25 पैकी एक पुऊष लठ्ठ असून गेल्या 15 वर्षांत भारतीय जाड होतच चाललेत…
? या पाचव्या फेरीनुसार, 15 ते 49 वयोगटातील सुमारे 6.4 टक्के महिला आणि 4 टक्के पुऊष लठ्ठ आहेत. याच वयोगटातील सुमारे 17.6 टक्के महिला आणि 18.9 टक्के पुऊषांचं वजन जास्त असलं, तरी ते ‘स्थूल’ गटात येत नाहीत…
? राजधानी दिल्लीत 14.2 टक्के महिला लठ्ठ असल्याचं दिसून आलेलं असून पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ 7 टक्के…
? दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या गोव्यातील सुमारे 9.5 टक्के स्त्रिया (किंवा 10 पैकी एक), तर केवळ 2.8 टक्के पुऊष लठ्ठ गटात मोडणारे…
? पंजाब हे भारतातील लठ्ठपणाचं सर्वाधिक प्रमाण असलेलं राज्य असून तिथं सुमारे 14.2 टक्के महिला आणि 8.3 टक्के पुऊष लठ्ठ असल्याचं आढळून आलंय…
? दक्षिण भारताकडे वळल्यास आंध्र प्रदेशमध्ये 12 टक्के महिला आणि 6 टक्के पुऊष, तर तामिळनाडूमध्ये 14.1 टक्के महिला आणि 8.7 टक्के पुऊष स्थूल…
? ईशान्येकडील फक्त तीन राज्यांत स्त्रियांपेक्षा पुऊष जास्त लठ्ठ असल्याचं नोंदवलं गेलंय, परंतु हा फरका फारसा मोठा नाही…त्यात मिझोराम, नागालँड व मेघालय यांचा समावेश होतो…
समृद्धी, वय यांचा संबंध…
? ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’चा डेटा सूचित करतो की, लठ्ठपणा नि समृद्धी यांचा जवळचा संबंध असून त्याचा सर्वांत जास्त प्रभाव हा श्रीमंत महिलांमध्ये दिसून येतो…त्यात श्रीमंतांना पाच गटांमध्ये विभागलेले असून सर्वोच्च संपत्तीच्या गटात 12.6 टक्के स्त्रिया (किंवा आठपैकी एक) लठ्ठ, तर तळाकडील गटात हेच प्रमाण (15 ते 49 वयोगटात) फक्त 1.6 टक्के म्हणजे प्रत्येक 100 महिलांमागं दोनपेक्षा कमी…
? पुरुषांमध्ये शीर्ष गटातील लठ्ठपणाचा दर 8 टक्के, तर तळाकडील गटात 1.2 टक्के…
? स्थूलतेच्या बाबतीत वयही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं दिसून येतंय…ही समस्या सर्वांत जास्त दिसून येतेय ती 40 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये. सर्वेक्षणानुसार, 2019 ते 21 दरम्यान या वयोगटातील सुमारे 11 टक्के स्त्रिया लठ्ठ असल्याचं आढळून आलं, तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण सुमारे 5.7 टक्के इतकं…
ग्रामीण नि शहरी फरक…
भारतात पुऊषांपेक्षा स्त्रियांमध्ये लठ्ठपणा अधिक दिसून येतोय…‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’नुसार, 15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण शहरी भागांत 12.9 टक्के, तर ग्रामीण क्षेत्रांत 5.5 टक्के…त्याच वयोगटातील पुऊषांमध्ये सदर प्रमाण अनुक्रमे 8.5 टक्के (शहरी) आणि 2.2 टक्के (ग्रामीण)…
संकलन : राजू प्रभू