कनिष्ठ आशिया चषक हॉकी
वृत्तसंस्था /सालालह (ओमान)
येथे सुरु असलेल्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा 9-1 असा तर पाकिस्तानने मलेशियाला 6-2 असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. 1 जून रोजी रात्री उशिरा अंतिम सामना खेळवला जाईल. बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत भारताच्या कनिष्ठ संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवत दक्षिण कोरियावर 9 गोल नोंदवले. भारताच्या धामी बोबी सिंहने हॅट्ट्रिक नोंदवत विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने 31 व्या, 39 व्या व 55 व्या मिनिटाला गोल नोंदवले. सुनीत लाक्राने 13 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. अरिजीत सिंहने 19 व्या मिनिटाला भारताकडून दुसरा गोल केला. यानंतर अंगद वीर सिंहने 34 व्या तर उत्तम सिंहने 38 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी वाढवली. यामुळे तिसऱ्या सत्रात भारतीय संघ 6-0 असा आघाडीवर होता. दक्षिण कोरियाकडून एकमेव गोल 46 व्या मिनिटाला के. होंगने केला. सामन्याच्या उत्तरार्धात विष्णुकांत सिंहने 51 व्या मिनिटाला भारताकडून सातवा गोल केला. धामी सिहंने 55 व्या मिनिटाला गोल करत आपली हॅट्ट्रिक साजली केली. यानंतर शारदानंद तिवारीने 57 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 9-1 अशी वाढवली.
भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी
विशेष म्हणजे, कर्णधार उत्तम सिंहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी साकारली आहे. बुधवारी कोरियाविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यातही सुरुवातीपासून भारताने आक्रमक खेळताना कोरियाला जराही गोल करण्याची संधी दिली नाही. संपूर्ण सामन्यात कोरियन संघाकडून एकच गोल नोंदवला केला गेला. आता, अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. याआधी बाद फेरीत भारत-पाक आमनेसामने आले होते, यावेळी सामना 1-1 असा बरोबरीत संपला होता. दरम्यान, कनिष्ठांच्या या स्पर्धेत भारत व पाकिस्तानने आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा जेतेपद पटकावले आहे. यामुळे अंतिम सामन्यात पाकला नमवत जेतेपद पटकावण्याची नामी संधी भारतीय संघासमोर असेल.