भारताकडून करारावर स्वाक्षरी ः तालिबानला मान्यता नाहीच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने तालिबानच्या राजनयिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक कोर्स ऍग्रीमेंटवर स्वाक्षरी केली आहे. इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ मॅनेजमेंटकडून आयोजित होणाऱया ‘इमर्सिंग विथ इंडियन शॉट्स’मध्ये पहिल्यांदाच तालिबान राजवटीचे सदस्य 4 दिवसीय या ऑनलाइन अभ्यासक्रमात भाग घेणार आहेत. विदेश मंत्रालयाकडून आयआयएम कोझिकोडच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम सादर करण्यात येत आहे.
अन्य अनेक देशांचे प्रतिनिधी देखील या ऑनलाइन अभ्यासक्रमात सामील होत आहेत. या अभ्यासक्रमाची सुरुवात मंगळवारपासून झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इंडियन टेक्निकल अँड इकोनॉमिक कॉर्पोरेशनच्या मदतीने सर्व भागीदार देशांना आमंत्रित करण्यात आले. हा कार्यक्रम अराजक स्थितीला कशाप्रकारे हाताळणे याचे धडे देणार आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या भारतीय दूतावासातून तालिबानचे राजनयिक या प्रशिक्षणात सामील होतील. तालिबान राजवटीच्या विदेश मंत्रालयाने स्वतःच्या सर्व कथित राजनयिकांना पत्र लिहून यात सामील होण्याची सूचना केली होती. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताने उचललेले हे पाऊल म्हणजे यशस्वी मुत्सद्देगिरी असल्याचे मानले जात आहे.
सहभागी व्यक्तींना भारतातील आर्थिक वातावरण, सांस्कृतिक वारसा, सामाजिक पार्श्वभूमी आणि बरेच काही अनुभवण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर ग्राहकांची मानसिकता, व्यावसायिक जोखिमींबद्दलही शिकविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आयटीईसीच्या वेबसाइटनुसार यात कमाल 30 जण सहभागी होतील आणि यात शासकीय अधिकारी, व्यापारी आणि उद्योजकांचा समावेश असेल.
ऑनलाइन अभ्यासक्रम
काबूलमधील अनेक जण या अभ्यासक्रमात सामील झाले आहेत, कारण हा अभ्यासक्रम ऑनलाइन आहे. तालिबानच्या पदाधिकाऱयाला भारताचा दौरा करण्याची गरज भासणार नाही. तालिबान राजवटीला एकाकी पाडण्याऐवजी शिक्षित करणे उत्तम आहे. याचमुळे त्याला आमंत्रित करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाद्वारे तालिबानलाही बऱयाच गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
पाक अन् तालिबानमध्ये तणाव
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात मागील काही काळापासून तणाव आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट अन्य देशांकडून स्वतःला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचमुळे तालिबान आता कुठल्याही वादात पडण्याऐवज राजनयिक संबंध सुधारू पाहत आहे. तालिबानने भारताला स्वतःचा भागीदार करण्याच्या दृष्टीने प्रारंभापासूनच प्रयत्न चालविले होते. तालिबान आता भारतासोबत मधूर संबंध ठेवू पाहत आहे. याचमुळे तालिबानने मागील काही काळात पाकिस्तान विरोधात भूमिका घेतली आहे. परंतु भारत तालिबानला मान्यता देणार नसला तरीही तालिबानच्या राजवटीशी संपर्क ठेवून राहणार असल्याचे मानले जात आहे.