वृत्तसंस्था/ राऊरकेला
भुवनेश्वर-रुरुकेला या ओडिशा राज्यातील शहरामध्ये होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी यजमान भारतीय हॉकी संघाचे येथे आगमन झाले. या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रित सिंगकडे सोपविण्यात आले आहे.
सदर स्पर्धा सुरू होण्यास अद्याप दोन आठवडे बाकी आहेत पण भारतीय हॉकी संघाचे सर्वप्रथम या स्पर्धेसाठी भुवनेश्वरच्या बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर हा संघ राऊरकेलामध्ये दाखल झाला. संघासमवेत प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड यांचा समावेश आहे. भारतीय संघाला आता सरावासाठी दोन आठवडय़ांचा कालावधी मिळणार आहे. राऊरकेलाच्या विमानतळावर भारतीय हॉकी संघाचे शौकिनांकडून जोरदार स्वागत झाले.
या स्पर्धेसाठी यजमान भारतीय हॉकी संघाचा ड गटात समावेश आहे. या गटामध्ये स्पेन, इंग्लंड आणि वेल्स यांचाही सहभाग आहे. या आगामी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीचा सामना स्पेनबरोबर होत आहे. त्यानंतर 15 जानेवारीला भारताचा दुसरा सामना इंग्लंडबरोबर राऊरकेलामध्ये खेळवला जाईल. भारताचा ड गटातील शेवटचा सामना वेल्सबरोबर भुवनेश्वरमध्ये 19 जानेवारीला होईल. प्राथमिक फेरीतील भारताच्या सर्व सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल. सदर स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, नेदरलँडस्, भारत, अर्जेंटिना, जर्मनी, न्यूझीलंड, इंग्लंड, फ्रान्स, कोरिया, मलेशिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, जपान, चिली आणि वेल्स या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस राहिल.
हॉकी इंडियातर्फे बक्षिसांची घोषणा
13 जानेवारीपासून ओडिशामध्ये सुरू होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱया प्रशिक्षक वर्गासाठी रोखरकमेची बक्षिसे बुधवारी जाहीर केली आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तर भारतीय संघातील प्रत्येक सदस्याला 25 लाख रुपये तर प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. रौप्यपदक मिळवले तर संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख तसेच प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 3 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. कांस्यपदक मिळवले तर संघातील प्रत्येक खेळाडूला 10 लाख तसेच प्रशिक्षक वर्गातील प्रत्येक सदस्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी हॉकी इंडियाच्या कार्यकारिणी समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारतीय संघाने 1971 साली झालेल्या पहिल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर 1973 च्या ऍमस्टेलव्हेन येथे झालेल्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक पटकावले होते. 1985 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने जेतेपदासह सुवर्णपदक मिळवले होते. ही स्पर्धा मलेशियात झाली होती आणि अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.