वृत्तसंस्था/ पल्लीकेले
भारतीय माहिला क्रिकेट संघाने लंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. सोमवारी येथे झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात भारताने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लंकेचा 10 गडय़ांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघातील रेणुका सिंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. तिने 28 धावांत 4 गडी बाद केले. या मालिकेत भारताने पहिला सामना 4 गडय़ांनी जिंकला होता. आता भारतीय महिला संघ ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी सज्ज झाला असून शेवटचा सामना येत्या गुरूवारी खेळविला जाईल.
या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंकेचा डाव 50 षटकांत 173 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने 25.4 षटकांत बिनबाद 174 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.
लंकेच्या डावामध्ये ए कांचनने 83 चेंडूत 2 चौकारांसह 47, कर्णधार अट्टापटूने 3 चौकारांसह 27, अनुष्का संजीवनीने 2 चौकारांसह 25, निलाक्षी डिसिल्वाने 3 चौकारांसह 32 आणि रणसिंघेने 10 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 11 चौकार नोंदविले गेले. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. रेणुका सिंगने 28 धावांत 4, मेघना सिंगने 43 धावांत 2 तर दिप्ती शर्माने 30 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना शफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीने 25,4 षटकांत अभेद्य 174 धावांची भारिदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्माने 71 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 71 तर स्मृती मानधनाने 83 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 94 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक
लंका 50 षटकांत सर्वबाद 173 (ए कांचन 47, अट्टापटू 27, संजीवनी 25, निलाक्षी डिसिल्वा 32, रेणुका सिंग 4-28, मेघना सिंग 2-43, दिप्ती वर्मा 2-30), भारत 25.4 षटकांत बिनबाद 174 (शफाली वर्मा नाबाद 71, स्मृती मानधना नाबाद 94).