चौथ्यांदा ठरले मानकरी : अंतिम लढतीत पाकवर 2-1 ने विजय : हॉकी इंडियाकडून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ सालालह (ओमान)
ओमानमधील सालालाह येथे झालेल्या ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्युनियर आशिया चषक हॉकीचा अंतिम सामना गुरुवारी (दि. 1 जून) खेळला गेला. या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 असे पराभूत करत विजेतेपद पटकावले. या जेतेदासह भारताने सर्वाधिक चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली.
भारताने 2004, 2008 आणि 2015 नंतर हा किताब चौथ्यांदा जिंकला. तर पाकिस्तान 1988, 1992 आणि 1996 मध्ये चॅम्पियन राहिला आहे. दोन्ही संघ याआधी तीनवेळा ज्यूनियर पुरुष हॉकी एशिया कपच्या फायनलमध्ये भिडले आहेत. पाकिस्तानने 1996 मध्ये विजय संपादन केला. तर 2004 मध्ये भारत विजयी झाला. भारताने याआधी मलेशियात खेळवण्यात आलेल्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानला 6-2 ने पराभूत करून किताब जिंकला होता.
सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमण केले. अखेर बाराव्या मिनिटाला अंगद बीर सिंगने मैदानी गोल करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर ही आघाडी दुप्पट करण्याचे काम संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या अरिजीत सिंगने केले. यामुळे मध्यंतरापर्यंत भारताकडे 2-0 अशी आघाडी होती. त्यानंतर पाकिस्तानसाठी 37 व्या मिनिटाला अब्दुल बशारतने एकमेव गोल केला. सामन्याच्या अखेरच्या सत्रात पाकला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण गोल नोंदवण्यात त्यांना अपयश आले. यानंतर भारतीय संघाने शेवटपर्यंत 2-1 अशी आघाडी कायम ठेवत विजयाला गवसणी घातली.
आठ वर्षांनंतर झाली स्पर्धा
यंदाची आशियाई कप ज्युनिअर हॉकी स्पर्धा तब्बल आठ वर्षांनी झाली. याआधी ही स्पर्धा 2015 मध्ये मलेशियामध्ये झाली होती. कोरोना माहामारीमुळे 2021 मध्ये या स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. या संपूर्ण हंगामात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा तर पाकिस्तानने मलेशियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
भारतीय संघाकडून 50 गोल
उत्तम सिंह याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. साखळी स्पर्धेत भारताने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर, एक सामना ड्रॉ झाला. भारताच्या गटात पाकिस्तान, थायलंड, जपान आणि चिनी तैपेई या देशांचा समावेश होता. भारताने साखळी सामन्यांत 39 गोल केले, तर भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघांना केवळ दोन गोल करता आले. संपूर्ण स्पर्धेत भारताने 50 गोल केले असून, भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला केवळ चार गोल करता आले.
हॉकी इंडियाकडून दोन लाखाचे बक्षीस
या विजयानंतर हॉकी इंडियातर्फे प्रत्येक खेळाडूंना दोन लाख तर सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींना प्रत्येकी एक लाखाचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच अनेक आजी-माजी हॉकीपटूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
प्रतिक्रिया
ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. या कामगिरीचा फायदा वर्षाखेरीस होणाऱ्या ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत संघाला निश्चित होईल. जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन!
दिलीप तिर्की, हॉकी इंडिया अध्यक्ष