2-0 फरकाने मालिकेत यश, रविचंद्रन अश्विन सामनावीर, चेतेश्वर पुजारा मालिकावीर
वृत्तसंस्था/ मिरपूर
श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी केलेल्या अभेद्य 71 धावांच्या भागीदारीच्या जोरावर संभाव्य पराभवाच्या छायेत वावरणाऱया भारताने यजमान बांगलादेशवर केवळ 3 गडय़ांनी विजय मिळविला. भारताने दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. अश्विनला ‘सामनावीर’ तर चेतेश्वर पुजाराला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या कसोटीत फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजांची कामगिरी जास्त उठावदार झाली. केवळ साडेतीन दिवसामध्ये हा सामना संपुष्टात आला. बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलेच दमविले. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने या सामन्यात दोन्ही डावात प्रभावी कामगिरी केली. भारताच्या दुसऱया डावात त्याने 63 धावात 5 बळी मिळवले तर कर्णधार शकीब अल हसनने दोन गडी बाद केले.
या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 145 धावांचे तुलनेने सोपे आव्हान दिले होते. भारताने 4 बाद 45 अशा केविलवाणी स्थितीतून आपल्या डावाला रविवारी पुढे सुरुवात केली. खेळाच्या चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 100 धावांची गरज होती. पण बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीचा कणा मोडला. रविवारच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱयाच षटकात नाईट वॉचमन जयदेव उनादकट शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर पायचित झाला. बाद होण्यापूर्वी त्याने मिराजच्या गोलंदाजीवर 1 षटकारही खेचला होता. शकीब अल हसनच्या अधिक वळलेल्या चेंडूवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो पायचित झाला. उनादकटने यावेळी रिव्हय़ू घेतला पण तो पायचित असल्याचे स्पष्ट झाले. भारताचा पाचवा गडी 56 धावावर तंबूत परतला. पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज पंत यावेळी यशस्वी ठरू शकला नाही. पहिल्या डावात 93 धावा जमवणाऱया पंतला मेहदी हसन मिराजने पायचित केले. पंतने 1 चौकारासह 9 धावा जमवल्या. भारताचा अक्षर पटेल बऱयापैकी सेट झाला होता. पण तो सातव्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात अक्षर पटेल त्रिफळाचित झाला. त्याने 69 चेंडूत 4 चौकारासह 34 धावा जमवल्या. भारताचा हा सातवा फलंदाज 74 धावावर बाद झाल्याने संघ अडचणीत आला होता.
यावेळी भारताच्या तुलनेत बांगलादेशचे पारडे निश्चितच जड वाटत होते. पण श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने फिरकीला साथ देणाऱया खेळपट्टीवर सावध फलंदाजी करत बांगलादेशचे विजयाचे मनसुबे उद्ध्वस्त केले. सुरुवातीला या दोन्ही फलंदाजांना मेहदी हसन मिराज आणि शकीब अल हसन यांनी अनेकवेळा चकवले. रविचंद्रन अश्विनला एका धावेवर असताना बांगलादेशकडून जीवदान मिळाले होते. या जीवदानाचा लाभ घेत अश्विनने खलिद अहमदच्या गोलंदाजीवर 2 सलग चौकार मारले. तसेच श्रेयस अय्यरने शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर पाठोपाठ 2 चौकार ठोकत हसनच्या गोलंदाजीची लय बिघडवली. मिराजच्या गोलंदाजीवर अश्विनने नंतर एक उत्तुंग षटकारही मारला. त्यानंतर त्याने सलग दोन चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोतर्ब केला. भारताने दुसऱया डावात 47 षटकात 7 बाद 145 धावा जमवित हा सामना तीन गडय़ांनी जिंकून मालिकेवर एकतर्फी कब्जा केला. अय्यरने 46 चेंडूत 4 चौकारासह 29 तर अश्विनने 62 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 42 धावा झळकवल्या. बांगलादेशतर्फे मेहदी हसन मिराजने 63 धावात 5 तर शकीब अल हसनने 50 धावात दोन गडी बाद केले.
यजमान बांगलादेशने भारतावर कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय मिळवण्याची संधी गमवली. या कसोटीत पिछाडीवर राहिल्यानंतर भारताने मुसंडी मारत आपला विजय नोंदवला. भारताने ही मालिका जिंकल्याने त्यांना आता आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱयांदा अंतिम फेरीत गाठण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया मालिकेनंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश प. डाव 227, भारत प. डाव 314, बांगलादेश दु. डाव 70.2 षटकात सर्वबाद 231 (लिटॉन दास 73, झाकीर हसन 51, नुरुल हसन 31, तस्कीन अहमद 31, शकीब अल हसन 13, अक्षर पटेल 3-68, मोहमद सिराज 2-41, रविचंद्रन अश्विन 2-66, उनादकट 1-17, उमेश यादव 1-32), भारत दु. डाव 47 षटकात 7 बाद 145 (गिल 7, राहुल 2, पुजारा 6, कोहली 1, अक्षर पटेल 34, उनादकट 13, पंत 9, श्रेयस अय्यर नाबाद 29, रविचंद्रन अश्विन नाबाद 42, मेहदी हसन मिराज 5-63, शकीब अल हसन 2-50).