घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये वाढ
घरगुती गॅस सिलिंडरदरात वर्षभरात 218 रुपये वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा चटका बसला आहे. नवा दर 6 जुलैपासून लागू करण्यात आला आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 218 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी कमर्शियल सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी घरगुती सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढविल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नव्या दरवाढीमुळे एका गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1,052.50 रुपये, दिल्लीत 1,053 रुपये, चेन्नईत 1,068.50 रुपये तर कोलकात्यात 1,079 रुपये झालेली आहे. हैदराबाद येथे दर सिलिंडरचा दर 1,100 पर्यंत पोहोचला आहे. अगोदरच अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईत वाढ झालेली असताना आता गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे.
चुकीच्या वेळी दरवाढ
खाद्यतेल, दूध, भाज्या, फळे, काही अन्नधान्ये आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकलेले असताना गॅसच्या दरातही मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांवर महागाईचा मोठा भार पडणार आहे, असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. घरगुती गॅसच्या दरवाढीची ही वेळ चुकीची आहे. बहुतेक ग्राहकांचे गॅस अनुदान रद्द करण्यात आलेले असताना अशी दरवाढ होणे योग्य नाही, असे मत व्यक्त झाले असून सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.
उज्ज्वला लाभार्थींचा अपवाद
केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींचा अपवाद वगळता आता बहुतेक गॅस ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान मिळत नाही. काही विशिष्ट राज्यांमध्ये ते दिले जाते, तथापि, ही रक्कमही बरीच कमी करण्यात आली आहे. अशा स्थितीत आणखी गॅस दरवाढ होणार नाही, अशी अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहक हित संस्थांच्या चालकांनी व्यक्त केली आहे.
पुरवठाही विस्कळीत
देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा पुरवठाही निर्वेधपणे होत नाही. या स्थितीत ही दरवाढ म्हणजे सर्वसामान्यांना आणखी मोठा त्रास आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्राहक हित संस्थेचे कार्यकर्ते टी. सदागोपन यांनी तामिळनाडूत व्यक्त केली.
एवढी दरवाढ होऊनही…
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गॅस दरवाढ होऊनही अद्याप भारतातील इंधन कंपन्यांची हानी भरुन निघालेली नाही. याचाच अर्थ असा की आजही सरकारला गॅस सिलिंडर त्याच्या उत्पादनाच्या किमतीपेक्षा कमी दरात विकावा लागतो. त्यामुळे गॅसच्या संदर्भात तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनुदानात वाढ केल्यास ती कंपन्यांना असहय़ होऊन नंतर एकदम मोठी दरवाढ करावी लागेल, असेही स्पष्ट पेले जाते.
प्रबोधन आवश्यक
गॅसचा उपयोग योग्यप्रकारे कसा करावा, आणि त्याची शक्य तितक्या प्रमाणात बचत कशी करावी, यासंबंधी सर्वसामान्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता काही तज्ञांनी बोलून दाखविली आहे. गॅस वाया न घालवता उपयोगात आणण्यासाठी काही सूचना तज्ञांनी कराव्यात, अशी जनतेचीही मागणी आहे.
सरकारकडून कारणे
गॅसची दरवाढ सुखासुखी किंवा मुद्दाम केलेली नाही. लोकांचा त्रास वाढविण्याचा सरकारचा उद्देश कसा असू शकेल? जनतेवर हा महागाईचा भार आहे, याची सरकारला कल्पना आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर भरमसाठ वाढले आहेत. भारताला 85 टक्के इंधन तेल आयात करावे लागते. याच तेलापासून स्वयंपाकाचा गॅस तयार केला जातो. परिणामी, तेलदर वाढल्यास गॅसचे दरही वाढविण्याशिवाय पर्याय रहात नाही, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.