कुणीकोनूर येथील प्रकार; प्रांताधिकारी कटयारे यांच्या आदेशानुसार दोघांवर गुन्हा दाखल
जत- प्रतिनिधी
बनावट कागदपत्र सादर करून ग्रामपंचायत बाज येथे विवाह नोंदणी केल्याचा प्रकार प्रांताधिकारी जोगेंद्र कटयारे यांनी उघडकीस आणला आहे. बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे कुणीकोनूर येथे तलाठी कार्यालयात वारसा हक्क नोंद केली आहे. या संदर्भात चुकीची वारसा नोंद झाल्याबाबत गौरी विकास साखळकर व उषा विकास साखळकर (रा. मुंबई )यांनी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे यांच्याकडे अपील दाखल केले होते. प्रांताधिकारी यांनी याबाबतची खतरजमा करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तलाठी स्वप्निल घाडगे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. उमदी पोलिसात लक्ष्मी सुब्रमंडम स्वामी रा. बाज व खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या एका अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , संशयित आरोपी लक्ष्मी सुब्रमंडल स्वामी यांनी राजेंद्र दिनकर साखळकर यांच्याशी बाज येथे २० एप्रिल २००६ रोजी विवाह झाला असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात केली आहे. सदरची विवाह नोंदणीस खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या कागदपत्राच्या आधारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवले. विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधारे कुणीकोनूर तलाठी कार्यालयात २७ सप्टेंबर २०१९ रोजी वारसा हक्क नोंद करण्यात आला आहे .सदरची नोंद मंजुरी आहे.
दरम्यान, साखळकर यांचे वारस गौरी साखळकर व उषा साखळकर यांनी जत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदरची विवाह नोंदणी कागदपत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले . प्रांताधिकारी कटयारे यांनी बनावट खोटी कागदपत्रे तयार करणारे व खोटे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश यांनी दिले होते. यानुसार तलाठी स्वप्निल घाडगे यांनी दोघावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खोटी कागदपत्रे शासनास सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत भविष्यात खोटी कागदपत्र सादर करणार्यावर चाफ बसणार आहे. प्रांताधिकारी यांनी केलेली ही तालुक्यातील तिसरी मोठी कारवाई आहे.