योग्य पद्धतीने काम करण्याची अधिकाऱ्यांनी केली सूचना : पाणीसाठा वाढविण्याचे आवाहन
बेळगाव : मार्कंडेय नदीचे आता पुन्हा पुन:श्चेतनाचे काम जिल्हा पंचायत व तालुका पंचायतने हाती घेतले आहे. तब्बल 25 कि.मी. खोदाईचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योग खात्रीची याला जोड देण्यात येणार आहे. याची पाहणी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी केली आहे. त्यांनी योग्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना कामगारांना केल्या आहेत. पाणीसाठा अधिक करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मागील सहा ते सात वर्षांपूर्वी याचे उद्योग खात्रीतून काम केले होते. आता पुन्हा या नदीची स्वच्छता, खोदाई व उंची वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. एकूण 25 किलो मीटरची खोदाई करण्यात येणार आहे. यामधील 12 ग्राम पंचायतच्या हद्दीतून जाणाऱ्या नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे. याचबरोबर आराखडा तयार करण्यात आला असून, कामाला चालनाही देण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील उत्तर भागाला जीवनदायिनी ठरणाऱ्या मार्कंडेय नदीच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांनी जातीने लक्ष देवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गांभीर्याने विचार करून काम करा
दरम्यान मार्कंडेय नदी स्वच्छतेच्या मोहिमेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पावसाला लवकरच सुरूवात होणार आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे थोडीफार अडचण निर्माण होत असली तरी आता हे काम तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी घ्या आणि काम करा. ही नदी परिसरातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बऱ्याच कामगारांना काम दिले आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून काम करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर, साहाय्यक संचालक राजेंद्र मोरबद, नागराज यरगुद्दी, रमेश मादार उद्योग खात्रीतील कामगारवर्ग व इतर अधिकारी उपस्थित होते.
मार्कंडेय नदी शेतकऱ्यांना फायदेशीर
मार्कंडेय नदीमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून आलेल्या पुरामुळे मार्कंडेय नदीत पूर्णपणे गाळ साचला आहे. त्यामुळे पुन्हा या कामाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. यासाठी उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आहे. यामुळे उद्योग खात्री योजनेतील कामगारवर्गालाही काम मिळणार आहे. तर नदीही स्वच्छ होणार आहे. यासाठी आम्ही तातडीने हे पाऊल उचलून स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे काम जेवढ्या लवकर होईल तेवढे बरे होणार आहे.