प्रतिनिधी,कोल्हापूर
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.धरणक्षेत्रातील सुरक्षा महत्वाची आहे.तसेच तेथील हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.त्यामुळे तत्काळ जॅकवेल परिसरात सर्व हवामानात टिकतील असे दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयातील बैठक प्रसंगी ते बोलत होते.आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सतेज पाटील म्हणाले,काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेचे काम गतीने सुरु झाले आहे.लवकरच येथील काम पूर्ण होणार आहे.त्यामुळे जॅकवेलच्या ठिकाणी सुरक्षा भिंत उभारावी.तसेच 24 तास सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.तज्ञ स्टापची नियुक्ती करावी.याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवावे.त्याचे कंट्रोल कोल्हापुरातील मनपा कार्यालयात ठेवावे.आतापासून मनपाने याचे नियोजन करावे.टेंडर प्रक्रिया सुरू करावी.जेणेकरून काम पूर्ण झाल्यानंतर हे कार्यन्वित होईल.
सीसीटीव्ही कॅमेरे हायटेक बसवा
काळम्मावाडी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस असतो. पावसामुळे कॅमेरे बंद पडू नयेत. यासाठी हायटेक कॅमेरे बसवावे.यामधील तज्ञांकडून माहिती घेऊनच कॅमेऱ्यांची खरेदी करावी, अशा सूचनाही आमदार पाटील यांनी दिल्या.
अडीच वर्ष नगरसेवक नसल्याने बट्याबोळ
महापालिकेमध्ये अडीच वर्ष झाले नगरसेवक नाहीत.यामुळे मनपा प्रशासनाचा बट्याबोळ उडाला आहे.नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.झूम प्रकल्पातील कचऱ्यावरून स्थिती समजून येते.यापूर्वी मनपा कर्मचाऱ्यांच्या चुका पदरात घेतल्या आता मात्र, गप्प बसणार नाही, अशा शब्दात आमदार पाटील यांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रशासनामध्ये फाईल दिरंगाई
महापालिकेमध्ये कोणत्याही कामाच्या फाईल वेळेवर मंजूर होत नाही.लालफिताच्या कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची खंत आमदार सतेज पाटील यांनी बोलून दाखविली.झूम प्रकल्पासाठी लाईट दिली नसल्याने 53 टन क्षमतेचा प्रकल्प बंद आहे.प्रशासक डॉ. बलकवडे नियोजन करतात,सूचना करतात.परंतू अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचे चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले.
रंकाळा काँक्रटीकरणाचे जंगल होऊ नये
रंकाळा तलावातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रदूषणमुक्त तलाव करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. परंतू सरकार तलावाच्या सुशोभिकरणावर भर देत आहे. रंकाळा तलाव काँक्रटीकरणाचे जंगल होऊ नये.