नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राहुल गांधी यांनी चार वर्षांपूर्वी केलेल्या भाषणात केवळ कोणत्या व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण अन्य मागासवर्गिक समाजाचाच अवमान केला आहे. पण त्यांनी अद्यापही देशाची क्षमायाचना केलेली नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखत कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.
याच अवमान प्रकरणात गांधी यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले आहे. तरीही त्यांच्यात सुधारणा दिसत नाही. त्यांच्यावर सात प्रकरणे सुरु असून सातही प्रकरणांमध्ये ते जामीनावर आहेत. तरीही ते पंतप्रधान मोदी यांच्यावर अद्वातद्वा आरोप करतात. त्यांनी बेछुट आरोप करु नयेत. त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. राहुल गांधी यांना आता सरकारी निवासस्थानही गमवावे लागणार असून त्यांना तशी नोटीस पाठविण्यात आली आहे. ही सर्व कृती नियमाप्रमाणेच असून त्यात गांधी यांच्यावर कोणताही हेतुपुरस्सर अन्याय करण्यात आलेला नाही. आज त्यांच्या संदर्भात जे होत आहे, त्याला सर्वस्वी ते स्वतः जबाबदार आहेत. त्यांनी इतरांना दोष देऊ नये, असेही प्रतिपादन पियुष गोयल यांनी केले.