मुंबई महापालिकेच्या नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या काळात झालेल्या 12 हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. या प्रकरणाची विशेष चौकशी समिती मार्फत चौकशी करण्यात यावी व या संदर्भात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात यावा, अशी मागणी आ. अमित साटम यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असल्याची माहितीही साटम यांनी दिली.
आ. साटम म्हणाले, 1997 ते जून 2022 या 25 वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध कामांत 3 लाख कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याच अनुषंगाने नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या काळात झालेल्या सुमारे 12 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांमार्फत (कॅग) लेखा परीक्षण करण्यात आले. यात 3 हजार कोटींची कामे कोरोनासंबंधित होती. या लेखापरीक्षणात कॅगने अनेक कामांमध्ये सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार, अधिकारांचा गैरवापर, शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.
नोव्हेंबर 2019 ते जून 2022 या काळात महापालिकेने 214 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे, निविदा न मागवताच वाटप केले. 4 हजार 756 कोटींची कामे 64 कंत्राटदारांना देताना त्यांच्याबरोबर करारच करण्यात आला नव्हता. करार न केल्यामुळे महापालिकेला कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईच करता येत नाही. 3 हजार 356 कोटींच्या 13 कामांत थर्ड पार्टी ऑडिटर नियुक्त करण्यात आला नव्हता, असेही आ. साटम यांनी सांगितले.
कॅगच्या अहवालानुसार राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशांसारख्या निःपक्ष व्यक्तींचा समावेश असलेली विशेष तपास समिती (एसआयटी) नेमून चौकशी करावी व याप्रकरणी तातडीने एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणीही आ. साटम यांनी केली.