वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरात टायटन्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएल अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. पण वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने त्यांची निराशा झाल्याचे दिसून आले. रात्री दहा वाजेपर्यंत पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नव्हता.
सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने नाणेफेकही झाली नव्हती. ग्राऊंड स्टाफने लगबग करून खेळपट्टीवर दुहेरी कव्हर्स घातले. खेळपट्टीच्या आजुबाजूचा परिसरही झाकण्यात आला. पण नंतर वीजा व गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याने पंच व मैदानावर आलेले काही खेळाडू तंबूत परतले आणि सामना लवकर सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले. सामन्यासाठी गर्दी केलेल्या शौकिनांची मात्र पावसामुळे तारांबळ उडाल्याचे दिसून आले. पावसापासून बचाव करण्यासाठी ते आश्रयाचा शोध घेत होते. मुख्य खेळपट्टीच्या आजुबाजूला असणाऱ्या खेळपट्ट्या झाकल्या गेल्या नसल्याने त्या ठिकाणी बरेच पाणी साचले होते.
रात्री 12.06 मिनिटांनी सामना सुरू झाल्यास पाच षटकांचा खेळ होऊ शकेल आणि सुपरओव्हरची कटऑफ वेळ असेल रात्री 12.56 ची. पण त्याआधी सामना 9.40 वाजता सुरू झाल्यास पूर्ण 20 षटकांचा खेळ होईल, असे सांगण्यात आले होते. 9 च्या सुमारास पाऊस थांबला तेव्हा कव्हर्स काढण्यात आले आणि पंच मैदानात येऊन पाहणी करीत असताना पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळपट्टी झाकण्यात आली.
आयपीएलच्या नियमानुसार, अंतिम लढतीदिवशी पावसामुळे खेळ होऊ न शकल्यास पुढील राखीव दिवशी सामना खेळविण्यात येतो. राखीव दिवशीही पावसामुळे खेळ होऊ न शकल्यास साखळी फेरीनंतर पहिले स्थान मिळविणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्यात येते. विद्यमान विजेते असणाऱ्या गुजरात टायटन्सने साखळी फेरीअखेर पहिले स्थान मिळवले असून 14 पैकी 10 सामने जिंकत त्यांनी 20 गुण मिळविले तर चेन्नई सुपरकिंग्सने 17 गुणांसह दुसरे स्थान मिळविले होते.