सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नागपूर
इस्लाम धर्माचे आचरण केवळ भारतातच सुरक्षित पद्धतीने केले जाऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. गुरुवारी संघशिक्षा वर्गाला संबोधित करताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले. जे धर्म भारतात बाहेरुन आले आहेत, त्यांना सुधारण्याचे उत्तरदायित्व आपले आहे, असेही मत त्यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले आहे.
इस्लामच्या प्रारंभीच्या काळात संपूर्ण जगात त्याचे आक्रमण झाले होते. स्पेनपासून मंगोलियापर्यंत तो पसरला होता. तथापि, नंतरच्या काळात त्या त्या देशांमधील लोक जागृत झाले. त्यांनी संघटीतरित्या आक्रमकांचा पाडाव करुन आपले देश स्वतंत्र केले. त्यामुळे इस्लाम आक्रसला गेला. विदेशींना तेथून निघून जावे लागले. तथापि, भारतात मात्र इस्लामचा आदर केला गेला. भारतातच त्याचे आचरण सुरक्षितरित्या करण्यात येत आहे, असे मतप्रदर्शन त्यांनी केले.
अखंडतेसाठी प्रत्येकाचा प्रयास आवश्यक
भारताची एकता आणि अखंडता यासाठी प्रत्येकाने प्रयास करणे आवश्यक आहे. तथापि, आज सीमेपलिकडच्या आपल्या शत्रूंना आपले सामर्थ्य दाखविण्याऐवजी आपापसातच भांडत आहोत. देशात भाषा, पंथ, सांप्रदाय आणि सोयी-सवलतींसाठी अनेक तऱ्हांचे विवाद होत आहेत. आपण एका अखंड देशाचे नागरिक आहोत, ही भावना आपण विसरलो आहोत. बाहेरुन आलेल्या धर्मांचे लोक आजही बाहेरच्या प्रभावाखाली आहेत. मात्र, ते आपलेच लोक आहेत, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे, अशी मांडणी त्यांनी केली.
समाज म्हणून एकाच देशाचे
आपली पूजापद्धती भिन्न भिन्न असली तरी आपण समाज या नात्याने एकाच देशाचे नागरिक आहोत. आपल्यातील विविधता विलगतेच्या पातळीवर कधी जात नाही. आपले पूर्वच समानच होते, हे आपण साऱ्यांनीच जाणून घेणे आवश्यक आहे. प्राचीन काळापासून आपल्याकडे सर्वांना एकत्र करणारी संस्कृती आहे. हिंदी स्वराज्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र अशी संज्ञा दिली आहे. साऱ्या जगात ज्यांना पाय ठेवण्यासाठी जागा मिळाली नाही, त्यांना भारताने सन्मान दिला. स्थान दिले. आपल्या सर्वांचे रक्त एकच असल्याने आपण एकाच हिंदू राष्ट्राचे नागरिक आहोत, अशी भूमिका त्यांनी आपल्या भाषणात विशद केली.