मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय शक्य : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या गॅरंटी योजना राज्य सरकार 1 जूनपासून जारी करण्याची शक्मयता आहे. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. 1 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात या योजनेच्या अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीची तयारी, योजनेचा लाभ कोणाला द्यावा, याबाबतच्या मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास पाच गॅरंटी योजना राबवू, असे आश्वासन काँग्रेसने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला दिले होते. त्यानुसार 5 गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 8 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर त्याच दिवशी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीची रुपरेषा आणि मार्गदर्शक तत्त्वे नंतर जारी केली जातील, असे सरकारी आदेशात म्हटले होते.
त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखली. कर्नाटक विद्युत महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे, या योजना कोणाला लागू कराव्यात, याबाबत चर्चा झाली.
निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 10 किलो मोफत तांदूळ, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील मुख्य गृहिणीला 2 हजार रुपये, गृहज्योती योजनेंतर्गत दरमहा 200 युनिट वीज मोफत, युवा निधी योजनेंतर्गत बेरोजगार पदवीधरांना बेरोजगार भत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्याच्या प्रमुखांशी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत व्यापक चर्चा केली. गॅरंटी योजना जारी केल्याने सरकारवर किती आर्थिक भार पडेल, याचीही माहिती बैठकीत घेण्यात आली.
बैठकीत ऊर्जा, महिला आणि बालकल्याण खाते, परिवहन खाते, युवजन सेवा खाते आणि अन्न-नागरी पुरवठा खात्यातील वरिष्ठ अधिकारी, राज्याच्या मुख्य सचिव वंदीता शर्मा, अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. एन. प्रसाद आदी अधिकारी सहभागी झाले होते.
जनतेला दिलेला शब्द पाळणार : शिवकुमार
राज्य सरकार गॅरंटी योजना राबविणार आहे. आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याची पूर्तता करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. गॅरंटी योजनांबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सिद्धरामय्या हे स्वत: अर्थखात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे आम्ही या योजना राबविणारच. आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार आहे. आम्ही जे बोलतो, ते अंमलात आणतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. टीका करणाऱ्यांना करू द्या. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले.
महिलांना बसपास देणार
कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसेसमधून महिलांना मोफत प्रवास करण्यासाठी बसपास देण्यात येतील, यात शंका नाही. विरोधी पक्षांनी थोडा संयम ठेवावा. महिलांना मोफत बसपास देण्याबाबत येत्या 1 जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिवहन आणि धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंगारे•ाr यांनी दिली.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शालेय मुलांना ज्याप्रमाणे बसपास दिला जातो, त्याप्रमाणे महिलांनाही बसपास देण्यात येईल. याकरिता परिवहन खात्याला सरकारकडून पैसे देऊ. बसपास योजनेची अंमलबजावणी निश्चित आहे. बसमधून किती महिला प्रवास करत आहेत, याची माहिती आम्ही गोळा करत आहोत. ही माहिती एकत्रित करून मोफत बसपास योजना राबवू, असे त्यांनी सांगितले.