अमर सिद्धेश्वर स्वामीजींचे मत : मान्यवरांचा सत्कार
बेळगाव : मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजविली तरच बळकट राष्ट्र निर्मिती शक्य होणार आहे. आजची मुले मोबाईल व टीव्हीमुळे संस्कारशून्य बनत आहेत, अशी खंत कुंदरगी अडविसिद्धेश्वर मठाचे अमर सिद्धेश्वर स्वामीजींनी व्यक्त केली. कारंजी मठात नुकत्याच झालेल्या 264 व्या शिवानुभव कार्यक्रमात त्यांनी वरील विचार मांडले. समाजात नैतिक व अनैतिक मूल्ये एकत्रच असतात. केवळ नैतिक मूल्ये स्वीकारून जीवन जगलो तर जीवनात यशस्वी ठरणार आहोत, असेही स्वामीजींनी सांगितले. मनपाचे अधिकारी बसवराज हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी कारंजी मठाचे श्री मनिप्र गुरुसिद्ध स्वामीजी, अ. भा. वीरशैव महासभेच्या रत्नाक्का बेल्लद, सरला हेरेकर आदी उपस्थित होते. यावेळी युपीएससी परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेली श्रुती शिवानंद यरगट्टी हिचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सेवानिवृत्तीनिमित्त कामगार खात्याचे अधिकारी अडव्याप्पा गडदवर यांचाही स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीकांत शानवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रकाश गिरीमल्लण्णावर यांनी परिचय करून दिला. ए. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर व्ही. के. पाटील यांनी आभार मानले.