उंडिर बांदोडाच्या रोशनी नाईक यांचे पुरोगामी पाऊल
सदानंद सतरकर/ फोंडा
वडिलांच्या निधनाच्यावेळी मुलीने किंवा भावाचा मृत्यू झाल्याने त्याच्या बहिणीने चितेला अग्नी दिल्याच्या घटना ऐकीवात आहेत. पण पतीच्या अंतिम समयी खुद्द पत्नीने अग्निसंस्कार केल्याची घटना गोव्यात तरी दुर्मिळ होती. उंडिर-बांदोडा येथील रोशनी रोहिदास नाईक या 55 वर्षीय महिलेने एका जुन्या प्रथेला धक्का लावित, पतीच्या चितेला अग्नी देऊन सामाजिकदृष्टय़ा पुरोगामी पाऊल टाकले आहे.
बांदोडा पंचायतीचे माजी पंचसदस्य व वृत्तपत्र विक्रेते रोहिदास यशवंत नाईक यांचे शुक्रवार 28 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उत्तरक्रिया करण्यासाठी पाठिमागे मुलबाळ किंवा सख्खा भाऊ नाही. एक पुतण्या आहे, पण तोही विदेशात असल्याने मयताच्या चितेला अग्नी कुणी द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. जवळपासच्या नातेवाईकांपैकी कुणी स्वच्छेने पुढे आले नाहीत. अशा परिस्थितीत रोहिदास यांच्या अर्धांगिनी रोशनी यांनी आपण स्वतः अंत्यक्रिया करण्याची इच्छा दर्शविली. नातेवाईक व ग्रामस्थांनीही तिच्या या इच्छेचा आदर केला व शनिवार 29 रोजी दुपारी फोंडा येथील मुक्तीधाम स्मशानभूमित रोहिदास यांच्या पार्थीवावर अंत्यसंकार करण्यात आले. पत्नी रोशनी यांनी चितेला अग्नी देण्यापासून सर्व उत्तरक्रिया केल्या. यावेळी काही महिलाही त्यांच्यासोबत स्मशानभूमित उपस्थित होत्या.
रोशनी ही मूळ शिरोडा गावची लेक असून काही वर्षांपूर्वी रोहिदास नाईक यांच्याशी लग्न होऊन त्या उंडिर बांदोडा येथे सासरी आल्या. पतीच्या आजारामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली व ती समर्थपणे पेलतानाच आजारी पतीच्या निधनामुळे उत्तरक्रियाचा पेचही त्यांनी मोठय़ा धैर्याने पेलला. रोशनी या फारशा शिकल्या सवरल्या नसल्या तरी एका जुन्या प्रथेला धक्का लावण्याचे धाडस त्यांनी दाखविले. परिस्थितीने त्यांच्यावर ही वेळ आणली खरी, पण तेवढय़ाच निडरपणे त्या परिस्थितीला सामोरी गेल्या. अंत्यसंस्कार हे पुरुषांनीच करायचे कर्तव्य या सामाजिक मानसिकतेला त्यांनी धक्का लावला व एक जुनी प्रथा मोडित काढली.
हल्लीच गोव्यातील विविध ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेशी संबंधीत काही अनिष्ठ गोष्टींविरोधात ठराव घेतले आहेत. पती निधनानंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा तर खूप वर्षांपूर्वी मागे पडली. ब्रिटीश काळातच त्यावर बंदी घालण्यात आली. मात्र पतीच्या निधनसमयी सर्वांसमक्ष पत्नीचे मंगळसूत्राचे मणी व बांगडय़ा फोडण्याची प्रथा अजूनही सुरु आहे. पती निधनानंतर स्त्रीयांना विधवा संबोधून बऱयाच धार्मिक कार्यांमध्ये तिचा सहभाग वर्ज्य मानला जातो. महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणाऱया काही जुन्या सामाजिक प्रथा बंद करण्याचे निर्णय महिला पंचसदस्यांनीच पुढाकार घेऊन त्याविरोधात ठराव घेतले आहेत. रोशनी यांनी त्याही पुढे एक पाऊल टाकीत स्वतःच आपल्या पतीच्या चितेला अग्नी देऊन महिलांचे आत्मबळ वाढविले आहे.