हवामान खात्याचे सर्व अंदाज ठरले फोल ; विविध धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
पणजी : जागतिक पर्यावरण दिन काल सोमवारी कडक उन्हामध्ये व प्रचंड उकाड्यात गेला. येत्या शनिवार दि. 10 रोजी मृग नक्षत्र असून ते देखील कोरडे तर जाणार नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हवामान खात्याने दिलेले हवामानाचे अंदाज फोल ठरवित पावसाने अक्षरश: दडीच मारली आहे. दुसऱ्या बाजूने राज्यातील विविध धरणांतील पाण्याच्या पातळीने निच्चांक गाठलेला असून पुढील आठवड्यात गोव्यातील काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला प्रारंभ होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे. जूनची 5 तारीख ओलांडली तरी पावसाची लक्षणे काही दिसत नाहीत. काळे ढग आकाशात जमतात आणि हुलकावण्या देऊन जातात. गेल्या 5 वर्षांमध्ये साधारणत: मे च्या 15 तारखेपासूनच पावसाला प्रारंभ होत असे. यंदा तर जूनचा पहिला आठवडा होत आला तरी पावसाचा पत्ता नाही.
डोळ्याला लावण्याएवढाच पाऊस
यंदा केपे, सांगे, व सालसेतचा भाग सोडला तर अन्य भागात पाऊस असा झालाच नाही. केपे, सांगे व काणकोणच्या भागात गेल्या 15 दिवसांमध्ये दोनवेळा जोरदार पाऊस पडून गेला. मात्र सत्तरीसह गोव्यातील इतर भागात अद्याप जोरदार पाऊस पडलेला नाही. केवळ डोळ्याला पाणी लावण्याएवढाच पाऊस पडून गेलेला आहे.
आज तुरळक पावसाची शक्यता
हवामान खाते दररोज वेगवेगळे अंदाज देत आहे. यंदा प्रथमच या खात्याचे अंदाज पावसाळी ढग फोल ठरवित आहेत. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार आज दि. 6 जून तसेच 8 व 9 जून रोजी तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजेच मान्सूनचा कोणताच अंदाज व्यक्त केलेला नाही.
मान्सून अद्याप केरळातही नाही
दि. 10 जून रोजी म्हणजेच मृग नक्षत्रदिनी गोव्यात पाऊस पडेल याची शाश्वती देता येत नाही. मान्सून सध्या अंदमान-निकोबारमध्ये सक्रिय झाला आहे. तेथून तो केरळच्या सीमेवर पोहोचलेला आहे. मान्सूनने केरळला अद्याप सलामी दिलेली नाही. साधारणत: 30 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचतो, फार तर 2 जूनपर्यंत. मात्र यंदा अद्याप तो केरळमध्येही पोहोचलेला नसल्याने चिंता वाढत चालली आहे.
धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
गोव्यातील बहुतांश धरणांतील पाण्याचा साठा निच्चांकी पातळीवर पोहोचलेला आहे. तिळारी आणि साळावली धरणात अद्याप जुलैच्या पहिल्या आठवड्याला पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. एरव्ही दरवर्षी एव्हाना गोव्यात 15 ते 20 इंच पावसाची नोंद होत असायची. परंतु यंदा पावसाने दडी मारलेली आहे आणि जोरदार पावसाची शक्यताही कमीच आहे.
असह्या उकाडा, तापमान वाढले
गेले दोन दिवस राज्यातील उकाड्यामध्ये वाढ झालेली आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाणही वाढले गेले. सध्या पाराही वाढत आहे. रविवारी पारा 36 डि. से. पार करून गेला होता. सोमवारी 35 डि. से. च्याही पुढे होता. आणखी दोन दिवस उन्हाचे आणि उकाड्याचे चटके सहन करावे लागतील असा अंदाज व इशारा हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ ?
अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र गोव्यापासून फार दूरवर चक्रीवादळासंदर्भात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्याचे आज चक्रीवादळात रुपांतर होईल. मात्र या वादळाचा फटका ओमानला बसण्याची शक्यता जास्त आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रातील हवामानाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रीत केले आहे. चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली असली तरी नेमकी परिस्थिती काय आहे, या विषयीची माहिती आज मंगळवारी हाती येईल.
वाऱ्याचा वेग वाढणार
हवामान खात्याने राज्यात वाऱ्याचा वेग वाढणार, असा इशारा दिला आहे. सध्या समुद्र खवळलेला आहे. किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 कि. मी. असून त्यात वाढ होऊन तो ताशी 65 कि. मी. पर्यंत होईल, असा इशारा दिला आहे.