आपल्या शालीन, घरंदाज, सात्विक नि सुसंस्कृत अभिनयातून मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविणाऱ्या सुलोचनादीदींच्या निधनाने एका सोज्वळ पर्वाचीच अखेर झाली आहे. प्रेमस्वऊप आई असो वा मायाळू वहिनी, भावजय, जाऊ, नणंद किंवा बहीण असो. सुलोचनादीदींच्या अभिनयातून प्रेमाचा, मायेचा झरा अखंडपणे पाझरत असे. अभिनयातील हा कधीही न संपणारा जिवंतपणा हाच त्यांच्या कारकिर्दीचा विशेष होय. लोभस चेहरा, बोलके डोळे आणि त्याला लाभलेली सोज्वळतेची जोड याचे जणू त्यांना वरदानच लाभलेले. त्या जोरावरच त्यांनी एक, दोन नव्हे, तर तब्बल पाच ते सहा दशके चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बेळगावच्या चिक्कोडीतील खडकलाट हे त्यांचे मूळ गाव. लहानपणी हरवलेले आई-वडिलांचे छत्र, मावशीसोबत धरलेली कोल्हापूरची वाट अशा खाचखळग्याच्या प्रवासात त्यांचे सिनेसृष्टीकडे लक्ष वेधले गेले. ओळखीतून मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल चित्रमध्ये त्यांना कामही मिळाले. 1943 मध्ये ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही साकारली. परंतु, मनाजोगते कामही नव्हते. त्यात मास्टर विनायक यांनी आपली संस्था मुंबईत हलविली. त्यानंतर काही काळ चित्रपटापासून दूर असतानाच त्यांचा आबासाहेब चव्हाण यांच्याशी विवाह झाला नि आबासाहेबांच्या पाठिंब्यामुळे त्या पुन्हा चित्रपटाशी जोडल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पतीसही द्यावे लागते. मास्टर विनायक यांच्यानंतर दीदींनी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुऊवात केली नि तिथूनच त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले, असे म्हणता येईल. भालजींनी त्यांच्यातील गुण हेरले. दीदींचे पाळण्यातील नाव रंगू. मात्र, भालजींनी त्यांच्या सुंदर व बोलक्या डोळ्यांना साजेसे सुलोचना हे नाव त्यांना दिले नि पुढे त्या याच नावाने प्रसिद्ध झाल्या. सुलोचना यांचे डोळे सुंदर होतेच. तथापि, त्यांच्या अभिनयातील सौंदर्य, देखणेपणाला कोणतीही उपमा देता येणार नाही. भालजींच्या ‘जय भवानी’ या चित्रपटापासून त्यांनी खऱ्या अर्थाने चित्रभूमीवर पाय ठेवला नि मागे वळून पाहिले नाही. भालजींकडून अभिनयाचे धडे गिरविणाऱ्या सुलोचना यांनी 1949 साली त्यांच्याच ‘मीठभाकर’ या सिनेमात वठवलेली पारूची भूमिकाही संस्मरणीय ठरली. राजा परांजपे दिग्दर्शित ‘जिवाचा सखा’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही अशीच उत्तम. बाळा जो जो रे, वहिनीच्या बांगड्या, एकटी, मोलकरीण अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली कर्तव्यदक्ष, त्यागी स्त्री म्हणजे अभिनयाचा उत्कृष्ट आविष्कारच म्हटला पाहिजे. अर्थात त्यांच्या अभिनयाचे वेगवेगळे शेड्सही असेच डोळे दीपवणारे ठरतात. त्यात शालिनता, सोज्वळता, वात्सल्याबरोबरच भावतो तो त्यांचा खंबीरपणा. मुख्य म्हणजे या खंबीरपणात कोणताही अहम् डोकावत नाही ना आक्रमकता. त्यातही एक प्रकारचा शांत भाव अंतर्बाह्या भरून राहतो. हे त्यांच्या अभिनयाचे एक वेगळे वैशिष्ट्याच मानावे लागेल. आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला ‘महात्मा फुले’ हा चित्रपट एक अतिशय क्रांतिकारक व महत्त्वाचा सिनेमा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात सावित्रीबाई फुले यांची आव्हानात्मक भूमिका साकारत सुलोचनादीदींनी आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवून दिला. धाकटी जाऊ, सांगत्ये ऐका, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, हेही त्यांचे काही महत्त्वाचे चित्रपट. जिजाऊ माँसाहेबांची त्यांनी साकारलेली भूमिका अप्रतिमच. दीदी प्रमुख भूमिकेत असोत वा सहाय्यक. त्या प्रमुख नायिकाच वाटत. इतके त्यांच्या अभिनयात सामर्थ्य होते. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले स्थान पक्के केले. विशेषत: आईच्या भूमिका त्या समरसून करत असत. बिग बी अमिताभ बच्चनच्या ‘मजबूर’, ‘रेश्मा और शेरा’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘याराना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी निऊपा रॉय यांच्या तोडीच्या भूमिका केल्या. सुनील दत्त, देव आनंद, राजेश खन्ना अशा आघाडीच्या अनेक अभिनेत्यांची ‘आई’ पडद्यावर त्यांनी जिवंत केली. सुजाता, हिरा, झुला, मेहरबान, चिराग, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरिब, डोली, कटी पतंग, प्रेमनगर या त्यांच्या चित्रपटांचा याबाबत उल्लेख करावाच लागेल. सुलोचनादीदींनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक असे बहुविध सिनेमे केले. कधी सालस, शालीन व घरंदाज नायिका, तर गरीब घराण्यातील स्वाभिमानी नायिका त्यांनी हुबेहूब वठविली. आपल्या वाट्याला आलेली भूमिका किती लांबीची आहे, हे त्या कधी पाहत नसत. तर छोट्यात छोट्या भूमिकेत जीव ओतत ती स्मरणीय कशी करता येईल, यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे त्यांच्या लहानात लहान भूमिकांनीही चित्रपटाला व्यापून टाकल्याचा अनुभव रसिकांनी घेतला आहे. दीदी केवळ पडद्यावरच हळव्या वा संवेदनशील होत्या, अशातला भाग नाही. व्यक्तिगत जीवनातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. 1961 च्या चिनी आक्रमणापासून ते वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलल्याचे पहायला मिळते. खरे तर दीदींनी एका चित्रपटात लावणी नृत्यही केले होते. परंतु, बोर्डावर नाचणे चाहत्यांच्या पसंतीस न पडल्याने अशा भूमिका त्यांनी पुन्हा केल्या नाहीत. ही निष्ठा अजोडच. मराठी चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेण्यात अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांचा मोठा वाटा आहे. त्यात या वात्सल्यमूर्ती आईचे योगदानही तितकेच महत्त्वाचे होय. आजचा चित्रपट बराच बदलला आहे. त्यात स्त्रीच्या अभिनयाला वाव देण्यापेक्षा इतर गोष्टींवर भर दिला जातो. अशा काळात सुलोचनादीदींच्या लोभस, सालस प्रतिमेची अधिकच गरज भासते.