नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आज बुधवारी देशाच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध होणार असून हा शपथग्रहण कार्यक्रम नेहमीच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रपती भवनात होणार आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देवविणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप ढंकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
8 नोव्हेंबरला न्या. उदय उमेश लळित हे सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाले. मात्र हा दिवस सुटीचा असल्याने त्यांचा निरोप सभारंभ सोमवारी 7 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला होता. या पदाची सूत्रे न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याकडे सोपविताना आपल्याला विषेश आनंद होत आहे, अशी भलावण त्यांनी केली होती.
दोन वर्षांहून अधिक कालावधी
सरन्यायाधीशपदी चंद्रचूड 2 वर्षे 1 दिवस एवढा कालावधी राहणार आहेत. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 या दिवशी झाला होता. त्यांची आई प्रभा या शास्त्रीय संगीताच्या तज्ञ होत्या. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबई आणि दिल्लीत झाले. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर 1982 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. नंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात एलएलएम आणि 1986 मध्ये ‘ज्युरिडिकल सायन्सेस’ या विषयात पीएचडी केले. त्यानंतर ते भारतात परतले.
पिताही सरन्यायाधीश
त्यांचे पिता यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. ते जवळपास सात वर्षे या पदावर होते. भारताच्या सरन्यायाधीशपदी सर्वाधिक काळ राहण्याचा मान आतापर्यंत त्यांना मिळाला आहे. पित्याच्या निवृत्तीनंतर 37 वर्षांनी आता त्यांचे पुत्र न्या. धनंजय चंदचूड हे देशाचे सरन्यायाधीश होत आहेत. पिता आणि पुत्र सरन्यायाधीश होण्याची घटना देशाच्या इतिहासात प्रथम आहे.
भक्कम निर्णयांसाठी प्रसिद्ध
न्या. धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या ठाम आणि भक्कम निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची असहमतीही ते स्पष्टपणे आपल्या निर्णयपत्रांमधून व्यक्त करतात. असहमती ही लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे मत त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. त्यांनी आपले पिता यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी दिलेले व्यभिचार आणि खासगीत्व या संदर्भातील निर्णय त्यांनी फिरवले आहेत. न्यायालयीन कामकाजाची माहिती घेण्याचा सर्वसामान्यांना अधिकार आहे, असे त्यांचे मत असून न्यायालयानी कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची यंत्रणा स्थापन करण्यासाठी ते प्रयत्नशील असून एकात्म व्यासपीठ यासाठी स्थापन करण्याचे कार्य सध्या सुरु आहे.