प्रतिनिधी /वास्को
गोव्यात कन्नड भाषिक नागरिक अनेक दशकांपासून वास्तव्यास असून त्यांना कन्नडीग म्हणण्यापेक्षा गोमंतकीयच म्हणायला हवे. गोव्यात कन्नड भवन व्हायलाच हवे तसेच कन्नड भाषिकांना गोव्यात निवडणुका लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे असे वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकी व गोमंतकीय असा भेदभाव करण्यात कोणताही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वास्कोतील वरूणापुरी मांगोरहिल येथील श्रीराम मंदिराच्या हॉलमध्ये रविवारी गोवा कन्नड भाषिक साहित्य संमेलनासंबंधित एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार दाजी साळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गोव्याचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी, त्यांचे इतर पदाधिकारी तसेच कन्नड साहित्यिकही व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आमदार दाजी साळकर यांनी गोव्यातील कन्नड भाषिक नागरिकांचे कौतुक केले. गोव्याच्या विकासात सर्वच क्षेत्रात कन्नड बांधवांनी योगदान दिलेले आहे. गोव्यात कन्नड भाषिक अनेक दशकांपासून राहतात. त्यांना आता गोमंतकीयच म्हणायला हवे. गोव्यात कन्नड भवन हवे ही त्यांची मागणी रास्तच आहे. आणि भवन जरूर बनेल असा विश्वास व्यक्त केला. त्यात मला योगदान देण्याची संधी मिळाल्यास मी ते माझे भाग्यच म्हणेन असे उद्गारही आमदार साळकर यांनी काढले. भवन उभारण्यावर कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही असे आमदार साळकर म्हणाले. अनेक राज्यात अनेक राज्यांच्या भाषांच्या नावाने किंवा राज्याच्या नावाने भवने असतात. ती त्या-त्या राज्यातील लोकांसाठी केलेली सोय असते. इतर राज्यात गोवा भवनही आहे. त्यामुळे गोव्यात कन्नड भवन उभारण्यात वावगे काहीच नाही असे त्यांनी स्पष्ट केले. गेमंतकीय आणि कन्नडीग असा भेदभाव करण्यात अर्थ नाही. गोमंतकीय आणि कन्नड भाषिक गोव्यात समाधानाने राहतात व राहतील. घटनेनुसार कोणी कुठेही निवडणूक लढवू शकतो. कन्नड बांधवांना गोव्यात निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुणी कुणाला रोखू शकत नाही असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, गोव्यातील कन्नड भाषिकांना गोंजारल्याबद्दल आमदार दाजी साळकर सोशल मिडियावर ट्रोल झालेले आहेत. त्यांच्यावर विशेषतः रिव्होल्युशनरी गोवन्सकडून कडक शब्दात टीका होऊ लागली आहे. या टीकेलाही आमदार साळकर यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमासमोर जोरदार उत्तर दिले. राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात दुफळी माजवू नका. त्यापेक्षा लोकांसाठी काम करा आणि लोकांची मने जिंका असा सल्ला त्यांनी आरजीवाल्यांना दिला आहे. टीका करताना ते जी भाषा वापरतात ते पाहता त्यांचा दर्जा दिसून येतो. गोवेकर सभ्यतेसाठी प्रसिध्द आहेत. ती वापरतात ती भाषा गोमंतकीय सभ्यतेला मान्य नाही. आरजीच्या समाजात द्वेष निर्माण करण्याच्या वृत्तीला आपण महत्व देत नाही असेही आमदार साळकर यांनी स्पष्ट केले आहे.