राहुल गांधींचा दावा : दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचा आशावाद
वृत्तसंस्था/ भोपाळ, नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 136 जागा मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर आता मध्यप्रदेशमध्येही कर्नाटकचेच प्रतिबिंब उमटेल असा दावा सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस मोठे यश मिळवत दीडशेहून अधिक जागा संपादन करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाष्य केले असून त्यांचा हा दावा मनोरंजनात्मक असल्याचे म्हटले आहे. तसेच मध्यप्रदेशात भाजप 200 हून अधिक जागा जिंकेल, असे ते पुढे म्हणाले. राज्यात विधानसभेच्या एकूण 230 जागा असून चालू वर्षअखेरीपूर्वी येथे निवडणुका होणार आहेत.
मध्यप्रदेशात सोमवारी काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या स्थितीबाबत आणि आगामी रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत मध्यप्रदेशात कोणती रणनीती बनवायची आणि मध्यप्रदेशात अधिकाधिक जागा निवडून आणण्याबाबत चर्चा झाली. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटनेचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल, राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
मध्यप्रदेशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने आता रणनीती आखण्यासाठी राज्यासह अन्य राज्यातील नेत्यांची मदत घेतली आहे. प्रत्येक विधानसभा आणि जिह्याच्या गरजा, जनतेच्या मागण्या आणि समस्यांनुसार एक वचनपत्र तयार केले जाईल, असे पक्षाने ठरवले आहे. भ्रष्टाचार, महागाई, कायदा सुव्यवस्था, एसटी एससी ओबीसी वर्गावरील अत्याचार, वाळू माफिया, शिक्षण माफिया, बेरोजगारी या मुद्यांवर काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.