वृत्तसंस्था/ लंडन
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत व ऑस्ट्रेलिया आमने-सामने असणार आहेत. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे अनेक खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. अशातच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा देखील डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. दिनेश कार्तिक डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात समालोचन पॅनेलचा भाग असेल. इंग्लंडमध्ये होण्राया या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यासाठी कॉमेंट्री पॅनेलमध्ये रिकी पाँटिंग, मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर, सुनील गावसकर, रवी शास्त्राr, नासिर हुसेन आणि कुमार संगकारा यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आता यामध्ये दिनेश कार्तिकचीही एन्ट्री झाली आहे.
कार्तिक 2021 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही समालोचन करताना दिसला होता. मात्र, त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले आणि त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. गतवर्षी झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा सदस्य होता मात्र मात्र, विश्वचषकानंतर पुन्हा कार्तिक भारताबाहेर गेला. यंदाच्या आयपीएल हंगामातही त्याने खूपच निराश केले. कार्तिकने 13 सामन्यात केवळ 140 धावा केल्या. त्याच्या या प्रदर्शनावर चोहोबाजूंनी टीका झाली. आता आयपीएलमधील खराब फॉर्मला मागे सोडत कार्तिक नवीन जबाबदारी निभावण्यासाठी सज्ज झाला आहे.