जालंदर पाटील / चुये
शिवसेनेमध्ये अंतर्गत बंडाळी उडाल्याने राज्याच्या सत्ताकारणात मोठ्या उलतापालती झाल्या महाविकासआघाडी सत्तेतून बाहेर गेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने भाजपाने सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी ची सत्ता संपुष्टात आल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात त्याच तीव्र पडसाद उमटले त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडाली. दोन्ही खासदार एकनाथ शिंदे गटात गेल्याने प्रत्येक तालुक्यात राजकीय समीकरणे बदलण्याची चित्र निर्माण झाले. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा करवीर तालुका मात्र सेनेच्या अंतर्गत बंडाळीपासून अजून तरी अलिप्तच राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तालुक्यातील सेनेचे वजनदार नेते आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट न करता सावध पवित्रा घेतल्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला कोणीच लागलेलं नाही. शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख शाखाप्रमुख आणि निष्ठावंत शिवसैनिक सेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच समर्थनात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे करवीर तालुक्याचे मातोश्रीलाच खंबीर बळ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना करवीर तालुक्यातून तब्बल 36000 मतांचे मताधिक्य दिले होते. यातून खासदार संजय मंडलिक यांना एक लाख वीस हजाराहून अधिक मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 85000 हून अधिक मते मिळाली होती. खासदार संजय मंडलिक यांच्या मताधिक्यात माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांच बळ मोठे होते. आमच ठरलय… करेक्ट कार्यक्रम… या भूमिकेतून व नेटक्या नियोजनातून माजी मंत्री सतेज पाटील यांनी आपल्या राजकीय विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम करून संजय मंडलीकांना खासदार केले होते.
त्यामुळेच शिवसेनेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एक खासदार मिळाला होता. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडीत जरी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी करवीर तालुक्यातील करवीर विधानसभा आणि दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या राजकारणावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कोणताच प्रभाव पडणार नाही कारण माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट न करता सावध पवित्रा घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं राजकीय बळ अजून तरी मातोश्रीच्या बाजूनेच आहे. तसेच माजी मंत्री आमदार सतेज पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांची करवीर तालुक्याच्या राजकारणावरती मजबूत पकड आहे त्यामुळे सेनेच्या बंडाळीचा करवीरच्या राजकीय समीकरणावर परिणाम झालेला नाही.
हे ही वाचा : पन्हाळ्य़ात मूळ शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाजूने
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट न केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सर्व सेनेचे पदाधिकारी अजून तटस्थच आहेत .त्यांच्या भूमिकेवरच राजकीय हालचाली होणार आहे. करवीर तालुक्यात नुकत्याच विसर्जित झालेल्या जिल्हा परिषद मध्ये दोन जि प सदस्य होते तर पंचायत समितीमध्ये चार पंचायत समिती सदस्य होते तसेच गोकुळच्या राजकारणात माजी आमदार नरके गटाचे दोन विद्यमान संचालक आहेत. त्याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे तसेच सेनेचे माजी जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख यांची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारी आहे. निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे करवीर तालुक्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच भक्कम बळ असल्याचे चित्र आज तरी स्पष्ट दिसत आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या तीन आठवड्यापासून राजकीय उलतापालतीच्या घटना घडल्या त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात त्या चे तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यातून दोन खासदार एक विद्यमान मंत्री व एक आमदार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात निर्णय आणि महत्त्वाची भूमिका असणारा करवीर तालुका आजही शिवसेनेच्या बंडाळीपासून चार हात दूरच आहे.
हे ही वाचा : शिरोळमध्ये पक्षीय कमी, गटातटाचे राजकारण अधिक
बदलत्या राजकीय घडामोडीत खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा गट दक्षिण आणि करवीर मध्ये पुन्हा नव्या जोमाने सक्रीय झाला आहे . त्यामुळे करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात नव्या घडामोडीतील नव्या राजकीय समीकरणाची नांदी पहायला मिळणार आहे .
गोकुळच्या नव्या घडामोडीत करवीर निर्णायक
जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखलेल्या गोकुळच्या सत्ताकारणात राज्याच्या राजकीय घडामोडीचे तीव्र पडसाद उमटणार आहेत .पाटील विरुद्ध महाडिक नवा राजकीय संघर्ष पुन्हा जोमाने उभा राहणार आहे. याचा केंद्रबिंदू गोकुळ असणार आहे. करवीर तालुक्यातून गोकुळ मध्ये माजी मंत्री आमदार सतेज पाटील गटा चे चार सदस्य माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे एक सदस्य तसेच आमदार पी एन पाटील गटाचे एक सदस्य असे सहा संचालक आहेत. सत्ताधारी गटासोबत हे सहा संचालक आहेत. गोकुळच्या सत्तांतराच्या चर्चेने जिल्ह्यात बराच जोर धरलेला आहे .विरोधी गटाने चाचपणी सुरू केलेले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तांतराच्या घडामोडीचा यामध्ये महत्त्वाचा रोल ठरणार आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी करवीर तालुका निर्णायक भूमिकेत दिसणार आहे एवढे मात्र नक्की.
हे ही वाचा : भुदरगड तालुक्यातील मूळ शिवसैनिक शिवसेनेबरोबर