बांधकाम खात्याचे दुर्लक्ष, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव : पावसाळ्यापूर्वी खडीकरण करून रस्ता खुला करणे योग्य
खानापूर : खानापूर-अनमोड हा रस्ता गोव्याला जाण्यासाठी कमी अंतराचा असल्याने या रस्त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. ऊमेवाडी क्रॉस ते मणतुर्गापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. तसेच अनमोड ते मेंडापर्यंतचा 5 कि. मी. चा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. रस्त्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला आहे. कंत्राटदाराने काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता खोदून मुरूम टाकलेला आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून काम बंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार असल्याने या भागातील 50 खेड्यांचे दळणवळण बंद होणार आहे. तसेच गोव्याची वाहतूकही बंद होणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खानापूर-अनमोड हा 30 कि. मी. चा रस्ता खानापूर व जोयडा तालुक्यातून जातो. खानापूर तालुक्यातील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून काही ठिकाणी रस्ताच निकामी झाला आहे. तर काही ठिकाणी मोठमोठे ख•s पडल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता. कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाची सुरवातही केली होती. मात्र गेल्या चार महिन्यापासून शेडेगाळी ते मणतुर्गा रेल्वेब्रिज हा रस्ता उखरुन काढण्यात आला आहे. आणि या ठिकाणी खडीकरणासाठी मुरूम आणि खडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा करून ठेवण्यात आली आहे. मात्र गेल्या चार महिन्यापासून कंत्राटदाराने हे काम पूर्णपणे थांबवले आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. जर येत्या दोन दिवसात निदान खडीकरण तरी करून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांतून होत आहे.
जर येत्या काही दिवसात हा रस्ता दुरुस्त न झाल्यास पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागीलवर्षी पावसाळ्यात हारुरी, शेडेगाळी रस्त्यादरम्यान मोठमोठे ख•s पडून या रस्त्यावरील वाहतूक कित्येक दिवस बंद होत होती. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना मणतुर्गा, असोग्यावरून खानापूर गाठावे लागत होते. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच 40 गावांच्या नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून कंत्राटदारालाच पाठीशी घालण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी राजेंद्र होनकांडे यांना विचारले असता, पावसाळ्यापूर्वी खडीकरण करून वाहतुकीस रस्ता योग्य करू, असे सांगून वेळ मारुन नेण्यात येत आहे. मे महिना संपल्याने पावसाळा केंव्हाही सुरू होण्याची लक्षणे असल्याने पावसात या रस्त्याचे काम योग्य पद्धतीने होण्याची हमी कोण घेणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने घेण्याची गरज
खानापूर-रामनगर रस्त्याचे काम गेल्या पाच वर्षापासून रखडले आहे. सहा महिन्यापूर्वी नव्या कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र रस्त्याचे काम ज्या पद्धतीने होणे आवश्यक होते त्या पद्धतीने ते झालेले नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना गेल्या पाच वर्षापासून या रस्त्यावरून धुळीतून व चिखलातून प्रवास करावा लागत आहे. नव्या कंत्राटदाराने योग्य नियोजन न केल्याने हे काम वेळेत पूर्ण होणार नसल्याने यावर्षीही या भागातील ग्रामस्थांना चिखलातूनच प्रवास करावा लागणार आहे, हे निश्चित आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे जोखमीचे असल्याने गोव्याला खानापूर-हेम्माडगा,अनमोड रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. त्यामुळे दोन वर्षापासून हाही रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते आणि कंत्राटदारात काय साठेलोटे आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.यासाठी लोकप्रतिनिधीनी या रस्त्यासंदर्भात गांभीर्याने दखल घेऊन खानापूर-हेम्माडगा रस्ता तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी प्रयत्न करावे तसेच खानापूर-रामनगर रस्त्यासंदर्भातही कंत्राटदाराला सूचना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.