खोची/प्रतिनिधी
खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षीय बालिकेचे दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी तिच्या राहत्या घरातून अपहरण करून त्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार केले. त्यानंतर, त्याचदिवशी संध्याकाळी त्या बालिकेचा मृतदेह गावातील जामा मशिदीच्या कंपाउंड येथे करंजीच्या झाडाखाली आढळून आला होता. याप्रकरणी वडगाव पोलिसांनी काही तासातच आरोपी प्रदीप उर्फ बंडा पोवार याला जेरबंद केले होते. आता या प्रकरणाचा अंतिम युक्तिवात शनिवार पासून होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे साऱ्या जिल्ह्याच्या लक्ष लागून असणार आहे.
त्यानंतर,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभगिय पोलीस अधिकरी रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलिसांनी काही तासातच आरोपी प्रदीप उर्फ बंडा पोवार याला जेरबंद केले होते. या गुन्ह्याचे तपासावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया लक्ष ठेवून होते. प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून वडगाव पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान,या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रशासनाने मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील ॲड.उमेशचंद्र यादव-पाटील यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक होण्यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.ॲड.पाटील यांनी सरकारपक्षातर्फे एकूण २८ साक्षीदार तपासून मरणोत्तर तपासणी अहवाल, पोस्टमार्टम, घटनास्थळ पंचनामा, आरोपी आणि पीडित बालिका यांच्या कपड्यांचे पंचनामे, घरचा पंचनामा, आरोपीने पंचनाम्यादरम्यान काढून दिलेले घटनेच्यावेळी वापरलेले रक्तलांछित कपडे, चप्पल, फोरेन्सिक प्रयोगशाळेचे अहवाल, घटनास्थळ आणि इतर पंचनाम्याचे फोटो, आरोपी व पीडित बालिका यांना घटनेच्या अगोदर पाहिलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अशी भक्कम पुराव्याची साखळी न्यायालयासमोर उभी केली आहे.
उद्या, शनिवार दि. १६ रोजी आरोपीचा जबाब प्रधान जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी यांच्यासमोर नोंदविला जाणार आहे. त्यानंतर, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील यादव-पाटील अंतिम युक्तिवाद सादर करतील. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ ६ सुनावणीच्या तारखांमध्ये यातील २८ साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकरणाकडे खोची सह परिसरातील ग्रामस्थांसह जिल्हयाचे लक्ष लागले आहे.