प्रतिनिधी/ खंडाळा
खंडाळ्यात शेतकरी सभासदांच्या कारखाना उभारताना अडचणी आणल्या. मात्र कारखाना उभा राहिल्यानंतर लगबगीने निवडणुकीच्या रिंगणात आले. मतदारांचा कौल मान्य करुन दुसर्या दिवशी खंडाळा कारखाना नव्या व्यवस्थापनाच्या ताब्यात द्यायची तयारी दर्शवली. मात्र सगळं काही हाती असूनही खंडाळा बंद ठेवला. तेच आता किसन वीर कारखान्याबाबत चाललं असून हा कारखाना ताब्यात घेवून तो केवळ कोणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आखला आहे. मात्र तो डाव कधीच यशस्वी होणार नाही, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी खंडाळा येथे व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमीत्त खंडाळा व भुईंज येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मदन भोसले म्हणाले, किसन वीर कारखान्याला काडीची मदत तर कधी केली नाहीच उलट अडचणी आणून हा कारखाना कसा बंद पडेल याचे प्रयत्न केले. राज्य सहकारी बँकेतून कर्ज मंजुर झालं होतं. मात्र ते रोखलं ते यांनीच. तसलं सुडाचं राजकारण यांना नेहमी जमतं. माझा ते द्वेष करतात तो द्वेष एकवेळ मला चालेल पण शेतकर्यांच्या अन्नात माती कालवण्याचं पाप का करताय? ही संस्था 52 हजार शेतकर्यांच्या मालकीची आहे याचेही भान त्यांना राहिले नाही. गेली निवडणूक यांनी लढवली नाही. का? तर म्हणे हा कारखाना महिन्याभरात जप्त होईल. त्यांनी तसे भरपूर प्रयत्नही केले. पण मी हार मानली नाही. हा कारखाना शेतकर्यांच्या मालकीचा आहे आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तो शेतकर्यांच्याच मालकीचा राहिल. मी तिथे शरण जात नसल्याने यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून कारखाना बळकावून तो कोणाच्या तरी पायावर वाहण्याचा डाव आखला असून तो उधळून लावा. किसन वीर कारखान्याचा कारभार करताना प्रतापगड सहकारात ठेवला, खंडाळ्याचा कारखाना उभारला. 3 डिस्टिलरी, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल असे अनेक उपक्रम उभारले. यांनी आजपर्यंत एखादी पतसंस्था उभारली का? प्रतापगड हडपायचा होता तो यांनाच. आज तो वाचवताना, खंडाळा उभारताना किसन वीरवर ताण जरुर आला. मात्र शेजारचं घर जळत असताना बघ्याची भूमिका घेणारा मी नाही. अडचणीवर मात करण्याची धमक असून त्यामुळेच रणांगन सोडून पळून गेलो नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी ठणकावले.
आमदार महेश शिंदे म्हणाले, जिह्यातील सहकाराला वेढा पडला असून पावणेचारशे कोटीचा जरंडेश्वर कारखाना अवघ्या कवडीमोलाने घेतला. टेंडरही न काढता तो गुरु कमोडीटीला दिला. तिथेही आधी आवई उठवली की कारखाना डॉ. शालिनीताईंंच्या नातेवाईकांनी खाल्ला. ज्या नातेवाईकांवर हे घाणेरडे आरोप केले त्या नातेवाईकांचे इमले उभे राहिले की जमिनी विकायला लागल्या ते जरा बघा. आज डॉ. शालिनीताई यांची उपजिविका पेन्शनवर सुरु आहे. त्यांनी कारखाना खाल्ला असता तर या अवस्थेत त्यांना रहावे लागले असते का? जरा तरी शरम बाळगली पाहिजे घाणेरडे आरोप करताना. गोबेल्स नितिचा वापर करुन तद्दन खोटेपणा करुन हा कारखाना गिफ्ट दिल्याप्रमाणे कोणाला तरी दिला. आज तोच डाव किसन वीर बाबत टाकला आहे. खासगी झालेल्या जरंडेश्वर कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ती भूक भागवण्यासाठी किसन वीर बंद पाडण्याची खेळी खूप मागे आखली आहे. त्यामुळेच गेली निवडणूक त्यांनी लढवली नाही. अडचणी आणू, कारखाना हडपू असा त्यांचा डाव होता. त्यांनी तशा अडचणीही आणल्या पण मदनदादांनी त्यांचे डाव आतापर्यंत हाणून पाडले. आता त्यांच्या जोडीला मी आलो आलो आहे. जी काही देणी आहेत ती देणी शंभर टक्के दिली जाणार आहेत. सगळ्याच गोष्टी उघडपणे बोलता येत नाहीत. सर्व तजवीज होत आली आहे. चुकून जरी विरोधकांच्या हाती कारखाना गेला तर शेतकर्यांची देणी ते बुडीत खाती मांडतील. भांडवलदार प्रवृत्तींनी शेतकर्यांची मालकी मोडीत काढण्याचे रचलेले हे षडयंत्र आहे. ते जरंडेश्वरमध्ये यशस्वी झाले पण प्रतापगडमध्ये झाले नाही. ते आता किसन वीर च्या बाबतीतही हाणून पाडा. मी माझ्या व्यवसायाच्या बळावर खिशातून जनसेवा करणारा कार्यकर्ता आहे. दुसर्याचं घर पेटत असताना शांत बसणारा मी नव्हे. त्यामुळेच किसन वीर कारखान्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शेतकरी विकास पॅनेलच्याच पाठिशी खंबीरपणे उभे रहा, असेही आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, धनाजी डेरे, नारायण पवार, सीए सी. व्ही. काळे, रतनसिंह शिंदे, दत्तात्रय गाढवे, बापूराव धायगुडे, विशाल धायगुडे, हर्षवर्धन शेळके पाटील, सतीश भोसले, पं. स. सदस्य दीपक ननावरे, सुजित डेरे, दिलीप शिंदे, पै. मधुकर शिंदे, पै. जयवंत पवार, विराज शिंदे, प्रवीण जगताप, सयाजीराव पिसाळ, अनुप सूर्यवंशी, शेखर भोसले पाटील, विजय चव्हाण, अतुल पवार, पृथ्वीराज पिसाळ, धनंजय बाबर, पै. माणिक पवार, बाबा खुडे, विशाल डेरे, अंकुश शिंदे, अनिता भासेले, पं. स. सदस्य चंद्रकांत यादव, रामदास कांबळे, बुवासाहेब पाटील, शरद देशपांडे, सी. बी. भोसले, हर्षवर्धन भोसले, साहेबराव महांगरे बंडु राऊत, दिनकरराव राऊत आदी उपस्थित होते. खंडाळा येथील मेळाव्यात अनिरुद्ध गाढवे यांनी तर भुईंजच्या मेळाव्यात भैय्यासाहेब जाधवराव यांनी स्वागत केले.