अन्धं तम: प्रविशन्ति ये विद्यामुपासते।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रता:।।
सरलार्थ : जे अविद्येचे अनुसरण करतात, ते घोर अंधारात प्रवेशतात. तर जे केवळ विद्येतच रत असतात त्यांचा त्याहूनही अधिक घनघोर अंधकारात प्रवेश होतो.
मध्यंतरी युरोपला जाण्याचा योग आला होता. तिथलं सगळं वैभव पाहिलं आणि कुठेतरी आपला देशही आठवत होता. सतत प्रत्येक गोष्टीची तुलना मनामध्ये चालू होते. इथले रस्ते, इथली पाण्याची व्यवस्था, इथली स्वच्छता, इथली इलेक्ट्रिसिटी इथले नियम या सगळ्या गोष्टी पाहताना आपण कुठेतरी कमी पडतोय असं उगीचच मनात येऊन जात होतं. त्यांचं सगळं वैभव पाहताना आपल्या गावामध्ये असलेले कोपऱ्या कोपऱ्यावरचे देव तिथे स्वच्छता, असं सतत डोळ्यासमोर येत होतं. आणि लक्षात आलं की हा देश काय आणि माझा देश काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर काय परिस्थिती होते, याची ही दोन उत्तम उदाहरणे. अति सुधारलेले देशसुद्धा आता अनेक प्रकारच्या काळज्यांनी घेरलेले दिसतात. तिथले लोक एकेकटे राहतात. निराशेमध्ये जगतायेत त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला माझ्या देशाचा विचार मनात आला की अती अंधश्रद्धा, अती देव देव हीसुद्धा माणसाला पुढे न सुधारू देणारी, जाऊ देणारी गोष्ट.
या दोन्ही गोष्टींचा अतिरेक या दोन्ही देशांमध्ये झाल्यामुळे कोणालाच त्यातून काही साध्य करता येत नाहीये. आम्ही नुसतीच प्रगती झाली किंवा अधोगती झाली असं म्हणत बसतो. अशावेळी अथर्वशीर्षातल्या ओळी मला आठवतात, तेत्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि, असे. आम्हाला ज्ञान असलं तरी ते विज्ञानसहित हवं. समजून स्वीकारलेलं हवं. पण मनामध्ये श्रद्धासुद्धा हवी. म्हणजे अध्यात्म आणि भौतिक प्रगती या दोन्ही गोष्टी जर हातात हात घालून चालल्या तर माणसाला सर्व काही साध्य होतं. दोन्हीच्या मध्यावर आम्हाला उभे राहता आलं पाहिजे. अतिरेकी अंधश्रद्धाही नको आणि अतिरेकी विज्ञानवादसुद्धा नको. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध होत नसते किंवा देव दिसतो किंवा भेटतो हेसुद्धा सिद्ध करता येत नाही ,अशा या गोष्टींमध्ये आम्ही योग्य प्रमाणात गोष्टी मान्य करून मगच पुढे गेलं पाहिजे. दोन्हीचा समतोल सांभाळून जगता येणारं ते खरं आनंददायी जगणं. मला देव कुठे दाखव? असं जर कोणी विचारलं तर मात्र दाखवता येत नाही. श्वास घेतो पण दाखवता येत नाही पण आनंदाने जगता येतं. आता जून महिन्यामध्ये आमच्या महाराष्ट्रात विठोबाची पालखी किंवा वारी सुरू होणार आहे. ही वारी बघायला जगभरातून लोक येतात. इतके मोठ्या संख्येने चालणारे लोक रस्त्याने चालतात कसे? जेवतात कुठे? झोपतात कसे? हे बघण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असते. या लोकांना कोण बोलवतं? याचं व्यवस्थापन कोण करतं? असेही प्रश्न त्यांना पडतात. आणि रस्त्याच्या कडेला तीन दगडांची चूल करून अन्न बनवणारे वारकरी पाहिले की हे लोक थक्क होतात. जमिनीवर झोपताना बघून अचंबित होतात. जगण्यासाठी कमीत कमी लागणाऱ्या गोष्टी पण प्रचंड आनंद देणारी ऊर्जा या वारीमध्ये आपल्याबरोबर त्यांनाही पाहायला मिळते. हे पाहिल्यानंतर या परदेशी लोकांना आपलं भौतिक सुख त्याच्यापुढे तुच्छ वाटायला लागतं. हीच गोष्ट आम्हाला या श्लोकातून लक्षात येते.
अति विज्ञानवादी लोक देवापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ म्हणायला लागतात आणि जगण्यावरची श्रद्धाच गमावून बसतात. अशावेळी अशी अंधश्रद्धेने जगणारी माणसं या लोकांना कुठेतरी एक वेगळीच ऊर्जा दाखवून जातात. म्हणूनच अंधश्रद्धा आणि विज्ञानवाद या दोन्हीचा संगम झाला तर जगामध्ये नक्कीच सुख शांती परत येईल अशी आशा वाटते.