Kolhapur News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने विशिष्ट भागातील घरे, दुकाने आणि प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. यामुळे बुधवारी दिवसभर शहरात वातावरण तंग होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून परवा (ता-7) 5 वाजल्यापासून पुढे 31 तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. परवा दिवसभर शहरात दुकाने, बससेवा बंद होती. सध्या शहरात शांतता असल्याचे कोल्हापूर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी बोलताना पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, आज पहाटेपर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. किती नुकसान झालं आहे याची माहिती लवकरच देण्यात येईल.दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ताब्यात घेतलेले 5 आरोपी अल्पवयीन मुले आहेत.अल्पवयीन मुलांना बालन्यायालयात हजर करणार आहे. कालपासू 36 जणांना अटक केली त्यातील 3 जण अल्पवयीन आहेत. त्याचबरोबर 300 ते 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्टेटस ठेवणारे सर्व आरोपी कॉलजेचे विद्यार्थी आहेत.एकानं स्टेटस ठेवला बाकीच्यांनी ते कॉपी केल होतं. अल्पवयीन मुलांची माथी भडकवून तेढ निर्माण करण्य़ात आलं आहे.सीसीटीव्हीच्या आधारे परीक्षण सुरु आहे.मात्र कालच्या राड्यात शहराबाहेरचं कुणी आढळल नाही. शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.एवढे लोक जमतील याची कल्पना नसल्याचेही महेंद्र पंडित म्हणाले.
दरम्यान, परवापासून इंटरनेट सेवा बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. आज सकाळी साडेदहा वाजता इंटरनेट सेवा सुरळीत झाली. इंटरनेट बंद असल्याने ऑनलाईन व्यवहार बंद होते.यामुळे जवळपास एक हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली.