काम उरकण्याच्या सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना
कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सीईओं संजयसिंह चव्हाण यांनी करवीर तालुक्यात सुरू असणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, वैयक्तिक शौचालय, पाणी गुणवत्ता कामकाज , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या कामे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांचा आढावा सोमवारी घेतला. यावेळी त्यांनी कामे गतीने करण्याच्या सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
करवीर तालुक्यातील ग्राम पंचायती कडील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉलमध्ये करवीर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, वैयक्तिक शौचालय, पाणी गुणवत्ता कामकाज , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच जल जीवन मिशन, व ग्राम पंचायत विभागाकडील विविध विषयांचा आढवाही या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालीका प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, उप अभियंता बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी ग्राम पंचायत निहाय कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. व प्रगती पथावरील सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्या बद्दल ग्रामसेविका सुरेखा आवाड, ग्रा.पं.शेळकेवाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याचं पध्दतीने सकाळच्या सत्रात पंचायत समिती गगनबावडा येथे सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक झाली. पुढील १५ दिवसात उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले असून पुढील आर्थिक वर्षातील कामांचे नियोजन व अपूर्ण कामांचा पाठपुरावा हा या बैठकींचा उद्देश आहे.