ऑनलाईन टिम : मुंबई
प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध आहेत. त्यांचे विचार ऐकून मी मोठा झालो. राजर्षी शाहू महाराज आजही जिवंत आहेत, कोल्हापुरात आजही त्यांचं अस्तित्व जाणवतं. महाराजांना जाऊन शंभर वर्षे झाली असली तरी आजही त्यांचे विचार जपले गेले आहेत, यापुढेही महाराष्ट्र त्यांचा विचार पुढे घेऊन जाईल. असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त व्यक्त केले. ते ऑनलाईन माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना बोलत होते.
शाहू महाराज हे सामान्य मानव नसून महामानव होते. त्यांना जेमतेम ४८ वर्षे आयुष्य लाभले, त्यांना आणखी ५-७ वर्षे मिळालं असती तर समाज सुधारणे बरोबर अन्य क्षेत्रातही बदल घडवून आणले असते. असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना, ‘जगावे कसे आणि कोणासाठी हे शाहूंनी दाखवले. ही अतिशयोक्ती नसून सत्य आहे. अनेक राजे होऊन गेले ते कोणाच्याही आठवणीत नाहीत, काही नुसतेच गादीवर बसले आणि होऊन गेले. पण शाहू महाराज नुसते गादीवर बसले नाहीत तर ते दिनदुबळ्यासाठी जगले. ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना शिक्षण देण्याचे काम केलं. ते नेहमी दिनदुबळ्यासाठी झटत राहिले, आज शाहू महाराजांना वंदन करताना त्यांना दाखवलेल्या वाटेवरून चालण्याचे गरज आहे. असेही ते म्हणाले.
तसेच ‘ज्या वृत्ती विरुद्ध महाराज लढले, ज्या वृत्तीने महाराजांना छळले ती वृत्ती मेली का? ती वृत्ती जिथं जिथं आहे ती संपवण्याचे काम आपले आहे. ती वृत्ती आपण संपवली नाही तर शाहूंच्या विचाराचा वारसा पुढे चालवू शकणार नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.