गडहिंग्लजच्या उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचा आरोप : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभाराचा मुद्दा वादात
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर सेवा ज्येष्ठता डावलून करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्याकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार दिला असल्याचा आरोप गडहिंग्लजच्या उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कृषी आयुक्तांकडे तक्रार दिली असल्याचे समजते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्ती झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदाचा पदभार सध्या करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी जालिंदर पांगरे (महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1, रुजू -2013) यांना देण्यात आला आहे. सदर अतिरिक्त पदभार घेण्यासाठी इच्छुक नसल्याचे फरांदे यांनी लेखी किंवा तोंडी कार्यालयास कळविलेले नाही. जिह्यात महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1 मधून त्या नियुक्त झाल्या ( महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग 1, रुजू 2009) असून पांगरे यांच्यापेक्षा ज्येष्ठ अधिकारी आहेत. फरांदे यांची सेवाजेष्ठता असताना देखील त्यांना डावलून या पदाचा पदभार त्यांच्यापेक्षा सेवा ज्येष्ठतेने कनिष्ठ अधिकाऱयांना देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार पांगरे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. परिणामी फरांदे यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.
महिला अधिकारी असल्याने मला जाणिवपूवर्क डावलले काय ?
विशेषतः एक महिला अधिकारी असल्याने या पदासाठी नाव प्रस्तावित करताना मला जाणीवपूर्वक डावलले गेले का ? आणि माझ्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लावले आहे का ? हा संभ्रम माझ्या मनात निर्माण झाला आहे. या व्यतिरिक्त माझे गोपनीय अहवाल आता माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकारी लिहिणार का ? हा प्रश्न देखील माझ्यासमोर निर्माण झाला असल्याचे फरांदे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले.
मानहानीकारक निर्णय
या सर्व घडामोडींमुळे माझ्या आजपर्यंतच्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणे काम केले असतानाही मला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. माझे सेवा अभिलेख निष्कलंक असावेत आणि शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम सेवा देऊन विभागाची मान उंचवावी अशा पद्धतीचे काम करण्याचा माझा सतत प्रयत राहिला आहे. परंतू माझी पूर्ण पात्रता असताना, केवळ महिला अधिकारी असल्याने माझे नाव प्रस्तावित केले गेले नाही, ही माझ्या सेवेसाठी मानहानीकारक बाब आहे. तसेच सेवाजेष्ठता आणि पात्रता असूनही पदभार न मिळणे माझ्या सेवा प्रतीमेस झाकोळणारे असल्याचे फरांदे यांनी स्पष्ट केले.
अंतर्गत कुरघोड्य़ांमुळे कृषी योजनांच्या कामकाजावर परिणाम
शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱयांसाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. यामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी तळमळीने काम करतात. तर काहीजण केवळ दिवस ढकलण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे अनेक तालुक्यात विविध योजनांची कामात दिरंगाई होत असल्याचे पहावयास मिळते. अशा परिस्थितीत या विभागात अंतर्गत कुरघोडींचे राजकारण असल्यामुळे कृषी विकासाच्या योजनांची गती मंदावणार आहे.