उजव्या कालव्यातून तुळशी जलाशयात पाण्याचा थेट विसर्ग सुरु
धामोड/ वार्ताहर
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यातील केळोशी बु॥ येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने आज गुरूवारी भरला. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरीत पाण्याचा प्रवाह उजव्या तीरावरील कालव्यातून थेट तुळशी जलाशयात सुरू झाला आहे. त्यामुळे ६१ टक्के भरलेल्या तुळशी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. एवढया लवकर ‘ओव्हरफ्लो ‘ होणारा राधानगरी तालुक्यातील खामकरवाडीनंतर केळोशी हा दुसरा प्रकल्प आहे.
केळोशी बु॥ येथील बैलगोंड नावाच्या लोंढानाल्यावर ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा लघुपाटबंधारे प्रकल्प सन २००६ साली बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केळोशी बु॥, कुंभारवाडी, सुतारवाडी, पिलावरेवाडी, देऊळवाडी, जाधववाडी, वळवंटवाडी, खामकरवाडी, अवचितवाडी, कुरणेवाडी कोते, चांदे आदी गावांना कमी – अधिक प्रमाणात शेतीसाठी फायदा झाला आहे. ऐन उन्हाळ्यात जानेवारी -फेब्रुवारी पासूनच हा प्रकल्प रिकामा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
हे ही वाचा : हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर, निलजी बंधारे पाण्याखाली
गेल्या आठ -दहा दिवसापासून परिसरात पावसाची जोरदार हजेरी सुरु आहे. केळोशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरित पाणी उजव्या तीरावरील सांडव्यावरुन थेट तुळशी जलाशयात वाहत आहे. त्यामुळे तुळशी जलाशयाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुळशी जलाशय परिसरात १५७५ मि.मी पावसाची आज अखेर नोंद झाली असून ६१ टक्के इतके धरण भरले आहे. केळोशी प्रकल्प गतसाली १४ जुलैला भरला होता तर याही वर्षी१४ जुलैलाच भरला आहे हा योगायोग.