विद्यापीठ प्रशासनासमोर अधिविभागातील प्राध्यापकांचे वाद मिटवण्याचे आव्हान; संशोधनात नावाजलेल्या विज्ञान शाखेची होतेय बदनामी
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
संशोधनाच्या जागतिक क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील 48 प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी आहेत. नॅक मूल्यांकन, एनआरएफ आदी मूल्यांकनातही विद्यापीठाने आपले नाव सुवर्णाक्षराने कोरले आहे. परंतु जागतिक पातळीवरील संशोधक असलेल्या विज्ञान शाखेतील प्राध्यापकांच्या अंतर्गत कुरघोडय़ा मात्र वारंवार चव्हाटय़ावर येत आहेत. गेल्या सहा वर्षापासून रसायनशास्त्र विभागप्रमुख पदाचा वाद आता परीक्षेसारख्या महत्वाच्या विभागापर्यंत पोहचला आहे. मंगळवारी रसायशास्त्र विषयाचा पेपर वेळेत सुरू होवूनही या पेपरमध्ये गोंधळ झाल्याची अफवा आहे, असे विभागप्रमुखांचे म्हणने आहे. एका प्राध्यापकांनी दुसऱया प्राध्यापकांबद्दल चुकीचा संदेश देवून पुन्हा एकदा अंतर्गत वादाला तोंड फोडल्याचे दिसते. या वादावर निर्बंध घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कोणती भुमिका घेणार, याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील प्राध्यापकांच्या वादात अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. संशोधनात जागतिक पातळीवर आणि नॅक आणि एनआरएफ मूल्यांकनात राज्यात नंबर वन असलेले विद्यापीठ दोन प्राध्यापकांमधील वादामुळे चर्चेचा विषय बनतय. मंगळवारी रसायनशास्त्र विभागातील एका विषयाचा रिपीटरचा पेपर होता. एक ब्लॉक आणि दोन विद्यार्थी होते. दहा वाजता पेपर सुरू होणार होता, परंतू सकाळी 9 वाजता एक प्राध्यापक प्रिंटर असलेल्या कार्यालयाची चावी चुकुन आपल्याबरोबर घेवून कँपसमध्ये गेले. त्यांना दुसऱया प्राध्यापकांचा फोन आला असता ते तातडीने कार्यालयात पोहचले. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाही विद्यार्थ्यांना वेळेत मिळाल्या. परंतू या संधीचा फायदा घेत त्यांचे विरोधक असलेल्या दुसऱया एका प्राध्यापकांनी विभागप्रमुखांकडे जावून विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करण्याची विनंती केली. परंतू वेळेत पेपर सुरू झाला आहे, मी तक्रार करणार नसल्याचे विभागप्रमुखांनी सांगताच त्यांनी आपल्या पातळीवर परीक्षेत गोंधळ झाल्याची घटना सर्वांपर्यंत पोहचवण्यात यश मिळवले. यातून कारण नसताना विद्यापीठाची बदनामी होत असल्याने ही बाब विद्यापीठ प्रशासन कशा प्रकारे हाताळणार यासंदर्भात शिक्षण वर्तुळात चर्चा आहे.
बदनामी करणाऱ्यावर कारवाई व्हावी
रसायशास्त्र विभागप्रमुख पदावरून दोन प्राध्यापकांचा वाद विद्यापीठाला धमकी देण्यापर्यंत गेला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोघांनाही विभागप्रमुखपद न देता तिसऱयालाच विभागप्रमुखपद देवून दोनवेळा वादावर पडदा टाकला. तरीही या विभागातील प्राध्यापकांमध्ये कायमचीच धुसपुस सुरू असते. आता विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱया परीक्षेसारख्या महत्वाच्या विभागापर्यंत हा वाद पोहचला, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे. तसेच पेपर उशिरा सुरू झाला असता तर परीक्षा संचालकांकडे तसा रिपोर्ट गेला असता, दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनीही तक्रार केली असती. परंतू असे काहीही नसताना पेपरमध्ये गोंधळ झाला ही गोष्ट कोणी बाहेर पसरवली त्या संबंधीतांची चौकशी केली पाहिजे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
रसायनशास्त्रची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार
रसायशास्त्र विभागातील फिजिकल केमेस्ट्री सेकंड पेपर होता, ते वेळेत सुरू झाला आहे. तरीही पेपर उशिरा सुरू झाला, अशी विनाकारण बदनामी करणाऱया प्राध्यापकांची चौकशी करून, योग्य ती कारवाई केली जाईल. रसायनशास्त्र विभागातील परीक्षेसंदर्भात केलेली बदनामी खपवून घेणार नाही.
डॉ. के. डी. सोनवणे (विभागप्रमुख, रसायनशास्त्र)
संबंधीताची चौकशी करून कारवाई करणार
रसानशास्त्रचा पेपर उशिरा सुरू झाला आहे, अशी कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्याकडे तक्रार आलेले नाही. प्राध्यापकांनी अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आणू नये. रसायशास्त्र विषयाचा पेपर उशिरा सुरू झाला, अशी बदनामी करणाऱयांवर कारवाई करणार.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)