निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप : कामगारांना धारेवर धरत काम पाडले बंद : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना निवेदन
प्रतिनिधी/इचलकरंजी
येथे बहुप्रतिक्षेनंतर सुरु असलेल्या रमाई आवास योजनेतील शौचालयासह इमारतीच्या निकृष्ट कामाचा पंचनामा आज लाभार्थ्यांनी केला. यावेळी केवळ बाजूचा मुरूम टाकून शौचालयाचे भांडे बसवले जात असून भिंतीना गिलावा करण्याच्या वाळूत सिमेंटचे नगण्य प्रमाण असल्याचा आरोप करत कामगारांना धारेवर धरण्यात आले. यानंतर कोल्हापूर येथे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील साईट नंबर 102 येथे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधणीचे कामाचा कार्यादेश मक्तेदारास 2014 साली दिला असून 2.84 कोटीचा निधी पालिकेत पडून आहे. याच्या व्याजाची रक्कमच 70 लाखापर्यंत पोहोचली आहे. पण आजतागायत यामधील 181 लाभार्थ्यांपैकी केवळ 96 लाभार्थ्यांना घरकुले प्राप्त झाली. पण या घरकुलांचा तसेच यासाठी असलेल्या शौचालय बांधण्याचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार वारंवार लाभार्थी संघटनेने केली आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला निवेदन व सूचना दिल्या आहेत. पण आजपर्यंत याबाबत सकारात्मक कार्यवाही झाली नाही.
रविवारी या ठिकाणी सुरु असलेल्या शौचालयाचे काम पाहण्यासाठी सुखदेव माळकरी यांच्यासह बाबुराव जाधव, काकासो हेगडे, सुनीता जाधव आदी. लाभार्थी गेले होते. त्यावेळी तेथील कामगार शौचालयाचे भांडे बसवताना आतील बाजूस मुरूमाचा थर टाकत असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा ढाळही व्यवस्थित दिसून आला नाही. त्याबरोबरच भिंतीना सुरू असलेल्या गिलाव्यासाठी वापरलेल्या वाळूमध्ये सिमेंटचे प्रमाण नगण्य असल्याचा संशय व्यक्त करत लाभार्थ्यांनी कामगारांना धारेवर धरले. यानंतर संबंधित अधिकाऱयांना फोनवरून याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण यापैकी कोणीही जागेवर पाहणीसाठी आले नाहीत. अखेर हे काम बंद ठेवण्याचे सांगत लाभार्थ्यांनी कोल्हापूर येथे अधिकाऱयांची भेट घेतली.
यावेळी संघटनेचे सुखदेव माळकरी व अन्य लाभार्थ्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी गेल्या अनेक वर्षापासून लाभार्थ्यांची होत असलेली हेळसांड व सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.
पाच महिन्यानंतरही लाभार्थ्यांना प्रतिक्षाच
रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण सहा इमारतींचे बांधकाम सुरु आहे. पण या ठिकाणी अजूनही तीन इमारतींचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत. मुख्याधिकाऱयांनी पाच महिन्यांपुर्वी या 181 लाभार्थ्यांपैकी 96 लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा दिला होता. त्यानंतर उर्वरित घरकुले दोन महिन्यामध्ये बांधून पुर्ण करून ती लाभार्थ्यांना दिली जातील अशी ग्वाही दिली होती. पण याला आता पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही लाभार्थ्यांच्या पदारात काहीही पडलेले नाही.