एकनाथ शिंदेंच्या गोटात दाखल; विमानाने गुवाहटीकडे रवाना; जिल्हा शिवसेनेत खळबळ
कोल्हापूर प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात कोल्हापूर जिल्हय़ातील आमदार प्रकाश अबीटकर आणि सहयोगी सदस्य असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावरकर हे दोघे शिंदेंच्या गोटात सहभागी झाले होते. आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉटरिचेबल झाले आहेत. ते शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले असून गुवाहटीकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.
कोल्हापूर उत्तरमधून दोनवेळा आमदारकी भूषविलेले राजेश क्षीरसागर सध्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. या पदाला कॅबिनेटपदाचा दर्जा आहे. क्षीरसागर कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेत असणारे क्षीरसागर 2009 मध्ये मालोजीराजे छत्रपती यांना पराभूत करून शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेत गेले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत करून दुसऱयांदा विधानसभा गाठली होती. आक्रमक आणि अनुभवी असणाऱया क्षीरसागर यांना दोनवेळा आमदार होऊनही मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. 2019 मध्ये ते पराभूत झाले, पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले. या पदाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर काम केले, तसेच कोल्हापूरसाठीही निधी आणला. शिवसेनेत क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची भूमिका काय असणार? याबद्दल उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे क्षीरसागर यांनी शिंदे यांचा गट जॉईन केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरूवारी दुपारी ते विमानाने गुवाहटीकडे रवाना झाले. त्याआधीच त्यांचा मोबाईल नॉटरिचेबल झाला होता.
क्षीरसागर यांनी गुवाहटीला रवाना होण्यापूर्वी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकसंघ राहण्याचे आवाहन केले हेते. तसेच सध्या निर्माण झालेल्या चक्रव्युहासारख्या परिस्थितीत चक्रव्यूह भेदण्यासाठी काही निर्णय घेणे अनिवार्य आहे. जिल्हय़ाच्या, राज्याच्या विकासासाठी आणि देशप्रेमासाठी काही निर्णय घेणे भाग पडत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आगामी वाटचाली संकेत दिले होते. त्यानंतर ते विमानाव्दारे गुवाहटीकडे रवाना झाले.
इतर चार माजी आमदारांचे काय?
चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर या उर्वरीत चार माजी आमदारांची भूमिका काय असणार? याबद्दल जिल्हय़ाच्या राजकारणात उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या चार आमदारांसह राजेश क्षीरसागर शिंदे यांनी बंड केले त्या दिवशी गोव्यात सहलीवर होते. त्यामुळे बंड आणि सहलीच्या योगायोगाचीही चर्चा रंगली होती. त्यातील क्षीरसागर यांनी शिंदे गट गाठला आहे. नरके, दोन पाटील आणि मिणचेकर यांच्याकडे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाची नजर आहे.