महावितरणकडून बदल्यांचे फर्मान : अन्यायी बदल्या रद्द करण्याची कंत्राटी कामगार संघाची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
वीज कंत्राटी कामगारांनी महसूल वाढवला. राज्यभर वीज यंत्रणा सुरळीत ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला. हे काम करताना अनेक कामगार शहीद झाले. त्यांच्या न्याय हक्कासाठी सलग 3 वर्षे आंदोलने करून देखील प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. याउलट पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी सुमारे 4 हजार कंत्राटी वीज कामगारांवर नाहक खोटे आरोप लावून त्यांच्या बदल्या करण्याचे तुघलकी फर्मान काढले आहे. हे आरोप मागे घेऊन बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी वीज कंत्राटी कामगार संघाने महावितरणकडे केली आहे.
6 जून रोजी महावितरण कंपनीचा 17 वा वर्धापन दिवस आहे. यादिवशी प्रादेशिक संचालकांनी संघटनेशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा. अन्यथा त्या दिवशी दुपारनंतर कामगारांना नाईलाजास्तव निषेध आंदोलन करावे लागेल असा इशारा संघटनेने दिला आहे.
कंत्राटदारांवर कारवाई न करता कामगारांनाच शिक्षा केल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था झाल्याचा आरोप संघाने केला आहे. सदर बदल्या कामगारांना व संघटनेला मान्य नाही. त्यामुळे पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर राज्य व्यापी आंदोलनाची भूमिका संघटनेला घ्यावी लागेल असा इशाराही प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.