846 कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर घालणार गस्त
प्रतिनिधी /मडगाव
यंदाच्या पावसाळय़ाला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झालेली असून त्यासाठी कोकणातील 740 किलोमीटर मार्गावर 846 कर्मचारी गस्त घालणार आहेत.
कोकण रेल्वे मागांवरुन रेल्वे वाहतूक सुरळीतपणे आणि सुरक्षितरित्या व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रत्येक वर्षी विशेष मोहीम आखत असते. यंदाही त्या संबंधीची तयारी केलेली असून सुमारे 846 कर्मचारी या मार्गावर गस्त घालून पहारा देणार आहेत.
केकण रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जी काळजी घ्यावयाची होती ती सर्व काळजी कोकण रेल्वेने घेतलेली आहे. पावसाच पाणी साचणार नाही आणि व्यवस्थित निचरा होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षात घेण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेमुळे डोंगराचे कडे कोसळण्याचे प्रमाण जवळ जवळ नाहीसे झालेले आहे. त्याचा परिणाम असा झाला की रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ लागलेली आहे. त्यामुळे गेल्या 9 वर्षात भलेमोठे दगड कोसळण्याचे प्रकार एकही घडलेला नाही, परिणामी रेल्वे सेवा विस्कळीत होणाचे प्रकार घडलेला नसल्याचा दावा कोकण रेल्वेने केलेला आहे.
घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कोकण रेल्वे पावसाळय़ातही गस्त चालूच ठेवणार आहे. त्यामुळे रेल्वे सुरळीतरित्या धाऊ शकतील. संभाव्य धोक्याच्या जागी 24 तास गस्त ठेवण्यात येईल. 24 तास चौकीदार तैनात करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे काही नाजूक जागी रेल्वेची वेग मर्यादाही अत्यंत कमी करण्यात येणार आहे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे असे कोकण रेल्वेने म्हटलेले आहे.
जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास रेल्वेचा वेग प्रती ताशी 40 किलोमीटर निश्चित करण्यात येणार आहे. वेर्णा तसेच रत्नागिरी येथे आपत्कालीन रेल्वे यंत्रणा तयार ठेवण्यात आलेली असून रेल्वेतील कर्मचारी आणि रेल्वे स्टेशन मास्टर त्याचप्रमाणे रेल्वे बाहेर असलेल्या कर्मचाऱयांमध्ये संवाध साधण्यासाठी बिनतारी यंत्रणेची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षितरित्या धावणार हे सुनिश्चित करण्यासाठी मडगाव, बेलापूर आणि रत्नागिरी येथे 24 तास खुले असेल असे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे.
पावसाची मोजमाप यंत्रणा मडगावसह माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, कारवार, भटकल व उडुपी येथे उभारण्यात आलेली असून त्यामुळे कोकण रेल्वेला सतर्क राहता येणार असल्याचे कोकण रेल्वेने म्हटलेले आहे.
10 जून ते 31 ऑक्टोबर या दरम्यान पावसाळी रेल्वे वेळापत्रक सुरु होणार असल्याने प्रवाशांनी रेल्वेची स्थितीची कोकण रेल्वे संकेतस्थळावरुन नोंद करुन घ्यावी असेही आवाहन कोकण रेल्वेने केलेले आहे.