मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी
जत/प्रतिनिधी
जत तालुक्याचे आ. विक्रमसिंह सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन म्हैसाळ सिंचन योजना पावसाळ्यात कार्यन्वित करून जत तालुक्यातील सर्व तलाव भरून देण्याची मागणी केली आहे.
आ. सावंत म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला जुलै ते ऑक्टोंबरच्या दरम्यान होत असणाऱ्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण होते. तर या कालावधीत जत विधानसभा मतदारसंघातील गावांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची प्रचंड टंचाई असते. पावसाळ्यातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून जत सारख्या दुष्काळी भागातील तलाव भरून घेतल्यास जत तालुक्यातील पाणी टंचाई दूर होईल.
तसेच दुष्काळातील पाणीटंचाई व चाराटंचाईसाठी महसूल यंत्रणेमार्फत राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना कराव्या लागणार नाहीत.
जत तालुक्यात टंचाईसाठी साधारणपणे १७ ते १८ कोटी रु.खर्च करावे लागतात. त्यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणाही कार्यरत असतात. हा खर्च वाचविण्यासाठी व जत तालुक्यातील दुष्काळ निवारणासाठी पुर कालावधीत म्हैसाळ योजना सुरु करून लाभक्षेत्रातील तलाव भरून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.