कुंभोज प्रतिनिधी
येथे मेंढपाळ संदीप विठ्ठल भानुसे, विठ्ठल लक्ष्मण घोदे, बिरू खानाप्पा पुजारी (रा. कुंभोज) या सर्व मेंढपाळांच्या 300 मेंढरांचा तळ खतासाठी आठ दिवसांपासून सुभाष दादा अकिवाटे यांच्या कुंभोज दुधगाव रोडवर (वारणा नदी जवळ उरूणात) असणाऱया शेतात (गट नंबर 2951) बसायला आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास तरसांनी हल्ला करून तारेच्या झाळीत ठेवलेल्या संदिप भानुसे यांच्या 11 बकऱयांना ठार केले. या हल्ल्यात मेंढपाळ संदिप विठ्ठल भानुसे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मेंढपाळ संदिप भानुसे व अमोल गावडे यांनी ही घटना यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना ही फोनवरून तत्काळ कळवली. घटनास्थळी वनरक्षक मोहन देसाई, प्रमोद गुरव, वनसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी उत्तम देसाई यांच्यासह भेट दिली. मोहन देसाई व त्यांचे सहकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चिकबिरे यांनी बकऱयांचे शवविच्छेदन केले.
संजय वाघमोडे यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांच्या हल्याच्या घटना वारंवार घडत आहे. मिरजवाडी, आष्टा व तुंग, दानोळी, कुंभोज याठिकाणी एकामागून एक अशा घडल्याने मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे. वन विभागाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई अत्यंत कमी मिळते. तसेच विमा कंपन्या व सरकार शेळ्या मेंढय़ाना विमा संरक्षण देत नाहीत. त्यामुळे मेंढपाळांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. चालू बाजारभावानुसार मटणाचा दर सहाशे ते सातशे रुपये किलो आहे. यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी, मागणी संघटनेच्यावतीने केली.
यावेळी शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे, सुभाष अकिवाटे, अमोल गावडे, सचिन पुजारी, प्रविण भानुसे, अनिल पाटील, राहुल पुजारी, यशवंत क्रांती संघटनेचे वाळवा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.